पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरात पुन्हा एकदा गुरव घराण्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरातील पूजा आणि ताबा घेण्याच्या परंपरेवरून दोन गुरव घराण्यांतून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास उग्र वाद झाला. यामुळे काही काळ मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी अनिल जनार्दन भगवान यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मंदिराच्या परंपरेनुसार त्या दिवशी पूजा करण्याची व मंदिराचा ताबा स्वीकारण्याची वेळ भगवान कुटुंबाची होती. मात्र, त्यावेळी हेमंत पद्माकर गाडे यांनी ताबा देण्यास विरोध केला. वादाच्या स्वरूपात त्यांनी शिवीगाळ केली व कुटुंबियांना दमदाटी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाद मंदिराच्या दक्षिण दरवाज्यासमोर झाला असून, त्यावेळी मंदिर परिसरात उपस्थित भाविकही काही काळ दहशतीत आले. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन्ही घराण्यातील व्यक्ती एकमेकांवर धावून जाताना व शाब्दिक चकमक करताना दिसत आहेत.यापूर्वीही कपालेश्वर मंदिरातील दानपेटी आणि पूजा करण्याच्या अधिकारावरून वाद निर्माण झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गुरव घराण्यातील वाद उफाळून आल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.सध्या या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.
या घटनेचा श्री कपालेश्वर मंदिर संस्थेशी कोणताही संबंध नाही. हा पूर्णपणे संबंधित व्यक्तींमधील आपसी वाद आहे. मंदिर संस्थेचे नाव या प्रकरणात जोडले जाऊ नये.
विलास पाटीलप्रशासक कपालेश्वर मंदिर




