राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार तर काही ठिकाणी मुसळधार सुरू आहे. महाबळेश्वरला यंदा चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसाबरोबरच ठिकठिकाणचे रस्तेही खड्ड्यात गेले आहेत. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ याबरोबरच आता ‘नेमेचि येणार्या पावसाबरोबर रस्तेही खड्ड्यात जाती हे लक्षात ठेवा’ असे म्हणायची वेळ दरवर्षी नागरिकांवर येत आहे. खरे तर एक अज्ञात कवीने ‘नेमेचि येतो मग पावसाळा; हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ असे पावसाचे खूप सुंदर वर्णन केले आहे. तथापि यंत्रणा कदाचित कवीच्या भावनेशी सहमत नसावी.
लोकांना पावसाचे अप्रूप वाटले तर लोक घराबाहेर पडतील. सृष्टीचे कौतूक अनुभवण्यासाठी फिरायला जातील. असे झाले तर धबधबे आणि पाण्याच्या ठिकाणी बंदोबस्त लावावा लागेल. धबधब्यांना कठडे बांधावे लागतील. धोक्याचा इशारा देणारे फलक लावावे लागतील. दुर्दैवाने अपघात झाला तर यंत्रणेचेच काम वाढेल. त्यापेक्षा दरवर्षी रस्तेच खड्ड्यात गेले (की घातले?) तर ‘ना राहेगा बॉंस, ना बजेगी बांसुरी’ अशी यंत्रणेतील अधिकार्यांची भावना असावी का? दरवर्षी पावसाइतकेच नियमितपणे रस्त्यांना खड्डे पडलेच पाहिजेत अशी काही खास योजना ठेकेदारांच्या सहकार्याने सरकारकडून राबवली जाते का? यंदाचा पावसाळाही त्याला अपवाद नाही. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक-कसारा दरम्यान प्रचंड खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर एक-दोन फूट खोल असल्याची तक्रार वाहनचालक करतात. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठते. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे दिसत नाहीत. परिणामी या मार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे.
कोल्हापूर परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. अगदी बंगळुरू महामार्गालासुद्धा खड्ड्यांचा प्रसाद मिळाला आहे. त्यामुळे त्या महामार्गावरील वाहतूक सुद्धा काही काळ बंद पडली होती. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर कोल्हापूर परिसरात केल्या गेलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाला तेथील स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतले होते. तथापि यंदाही रस्ते की खड्डे असा प्रश्न कोल्हापूरवासियांना पडला आहे. कोकणातील रस्त्यांच्या दुर्दशेची चलचित्रफीत वारंवार दाखवली जात आहे. महाबळेश्वरमधील व भोवतालचे अनेक रस्ते खचले आहेत. राज्याच्या अनेक शहरांमधील रस्त्यांची अवस्था यापेक्षा फारशी वेगळी नाही. रस्त्यांतील खड्ड्याना वैतागलेल्या नागरिकांनी काही ठिकाणी प्रतीकात्मक आंदोलने देखील केली.
मुंबईमधील काही महिलांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढली. एका रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये नागरिकांनी वृक्षारोपण केले. कल्याणमध्ये एका रस्त्यावर खड्ड्यात बसून होमहवन केले गेले. रस्त्यांच्या दुर्दशेचे गांभीर्य नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या आवाहनावरून स्पष्ट होते. ’नाशिक-कसारा दरम्यानच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड झाले आहे. रस्ता दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असेल तर वाहनधारकांनी टोल भरू नये’ असे प्रतिपादन त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले. घोटी टोलनाका प्रशासनाने आधी रस्ता दुरुस्त करावा आणि मगच टोल वसूल करावा असेही त्यांनी बजावले.
यावरून खासदार सुद्धा खड्डयांना किती वैतागले आहेत हे स्पष्ट होते. तथापि गोडसे यांनी दिलेला सल्ला नागरिकांनी अंमलात आणला तर काय होईल? हा महामार्ग त्वरित दुरुस्त करावा असा सल्ला त्यांनी यंत्रणेला देखील द्यायला हवा. लोकप्रतिनिधींवर देखील सल्ला देण्याची वेळ येते तेव्हा सामान्य वाहनचालकांच्या गैरसोयींबद्दल वेगळे काय बोलावे? या प्रश्नाचे गांभीर्य शासनयंत्रणा लक्षात घेईल का? रस्त्यांची दुरवस्था थांबवण्यासाठी उपाय योजेल का? रस्ते बांधणीच्या कामात सुधारणा करणारी अनेक आधुनिक तंत्रे वर्षानुवर्षे उपलब्ध आहेत. ते पाहून येणारी भारतीय मंडळी तिकडच्या रस्त्यांचे कौतूक सतत ऐकवत असतात. अनेक सरकारी अधिकार्यांनी तिकडच्या प्रवासात तो अनुभव घेतलाही असेल. तरी भारतातील रस्त्यांची दुर्दशा कमी करावी असे कोणालाच का वाटत नाही?