अहिल्यानगर (प्रतिनिधी)
बोल्हेगाव परिसरात राहणार्या 26 वर्षीय विवाहित महिलेनं पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण मानसिक-शारीरिक छळ, मारहाण, हुंड्याच्या मागणी, तसेच धमक्यांबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पती रवींद्र रघुनाथ वाघ, सासु बबनबाई रघुनाथ वाघ, दीर अंबादास रघुनाथ वाघ, जाव रूक्मीणी अंबादास वाघ (सर्व रा. नांदुर निंबादैत्य, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीप्रमाणे, त्यांचे लग्न 27 मे 2015 रोजी रवींद्र वाघ याच्यासोबत झाले.
प्रारंभी काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर फिर्यादीला पतीकडून दारूच्या नशेत मारहाण, तसेच मानसिक छळ सहन करावा लागला. याबाबत फिर्यादीने सासरच्या मंडळींना सांगितले असता त्यांनी दुर्लक्ष केले. सासू बबनबाई वाघ हिने लग्नात राहिलेले हुंड्याचे पैसे कधी आणणार? असा दबाव टाकल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. इतकेच नव्हे, तर सणासुदीच्या काळात फिर्यादीच्या वडिलांना देखील हेच पैसे आणण्यास सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, पतीने फिर्यादीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन मारहाण केली होती. यासंदर्भात त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सततच्या छळाला कंटाळून फिर्यादीने भरोसा सेलकडे तक्रार केली होती. तेथे समझोता न झाल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.




