Tuesday, March 25, 2025
Homeनगरधर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही - डॉ. विखे

धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही – डॉ. विखे

आश्वी बुद्रुक येथे युवक कार्यकर्त्यांशी साधला संवाद

आश्वी |वार्ताहर| Ashwi

मागील 70 वर्षांत शिर्डी मतदारसंघातील कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही. मात्र आज असं काय झालं की? प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात वाटू लागलं आहे. महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे, त्याबद्दल मला काही माहीत नाही. परंतु शिर्डी मतदारसंघात आपण सर्वजण एक आहोत. त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे युवक कार्यकर्त्याशी संवाद साधताना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. अशोक जर्‍हाड, नवनाथ ताजणे, भीमा शिंदे, अनिल कंगणकर, विजय म्हसे, अनिल म्हसे, संजय गायकवाड, सुनील जर्‍हाड, अनिल जर्‍हाड, विशाल वाकचौरे, महेंद्र जर्‍हाड, भाऊसाहेब खेमनर, सतीश म्हसे, प्रवीण गायकवाड, शरद चंद, गणेश जर्‍हाड, आनंद बालोटे, सुभाष होडगर, राजेंद्र होडगर, विशाल जर्‍हाड, प्रमोद जर्‍हाड, संपत भुसाळ आदींसह मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

डॉ. विखे पाटील म्हणाले, ज्या दारुड्याला घरात आणि गावात कोणी विचारत नाही. तो मोबाईलवर एखादे स्टेटस ठेवतो आणि आपण गाव बंद ठेवतो. आपण सुशिक्षीत असूनही भरकटत चाललोय का? तुमचं शिक्षण घेऊन काय उपयोग झाला?असा सवाल डॉ. विखे यांनी उपस्थित करत डॉक्टर असून जर मी भेदभाव मिटवू शकलो नाही तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही आणि मुलींची सुरक्षितता भंग होणार नाही यांची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

याचबरोबर जनसेवा युवा मंच अ‍ॅपबाबत माहिती देताना ते म्हणाले, याचा उपयोग युवकांचे संघटन, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी, विविध अर्ज तसेच गणेश मंडळांची नोंदणी करण्यासाठी प्रामुख्याने होणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत याची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करताना नोंदणी करणारे युवक माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार असल्याचे सांगितले. तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघटनेत काम करणार्‍या युवकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देखील डॉ.विखे यांनी दिली.

कोणत्याही पदाची गरज नाही..
स्व. बाळासाहेब विखे पाटील, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी यांसारख्या दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आश्वी बुद्रुक येथे माझा पराभव झाल्याचा जल्लोष करण्यात आला. याची खंत बोलून दाखवताना मला काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसल्याचे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...