मुंबई | प्रतिनिधी Mumbai
सत्ताधारी पक्षातील लोकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी येथे केली. कोट्यवधी रुपयांच्या जमिनी बळकवणाऱ्या दलालांचे सूत्रधार मंत्रालयात बसले आल्याची टीकाही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार भागीदार असलेल्या कंपनीमार्फत पुण्यात झालेला जमीन खरेदीचा व्यवहार वादग्रस्त ठरला आहे. या कंपनीने महार वतनाच्या ४० एकर जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी केली. शिवाय २१ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क माफी पदरात पाडून घेतली. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीवर शंका उपस्थित केली.
पार्थ पवार यांनी पुण्यातील ४० एकर महार वतनाची जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केली. त्यासाठी केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क रुपये भरले. त्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्तावही तातडीने मान्य करण्यात आला. त्यासाठी दस्तावेजामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आले. हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यानंतर आता जमीन खरेदी व्यवहार रद्द केला असे सांगितले जात आहे. चोरी केल्याची कबुली दिली जात असताना मग कारवाई का नाही? पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? या सर्व व्यवहारासाठी पैसे कुठून आले? हे पैसे कोणी दिले? कसे दिले? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. मात्र, चौकशी समिती नेमून सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जैन बोर्डिंगची जमीन लाटली होती. हा प्रकार उघड होताच व्यवहार रद्द करण्यात आला. तरीही हे प्रकरण संपलेले नाही. याप्रकरणातील धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यावर काय करवाई झाली? असा सवाल करत सपकाळ म्हणाले, मुंबईत अदानीला शेकडो एकर जमीन फुकटात दिली. पुण्यात रिंगरोडच्या जमीन अधिग्रहणात मोठा घोटाळा करण्यात आला. समृद्धी महामार्गात कोणाची समृद्धी झाली हेही जनतेला कळाले पाहिजे. यासाठी सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.




