शिक्षण हे माणसांचे जीवन उन्नत करण्यासाठी आहे. व्यक्तीमत्वाला आकार देण्यासाठी आहे. आपल्यातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी शिक्षण आहे. व्यक्तीत शहाणपण आणि विवेक उंचावणे हा शिक्षणाचा हेतू आहे. पुस्तके वाचने, स्मरणात ठेवणे, परीक्षा देणे, मार्क मिळविणे आणि पुढच्या वर्गात जाणे म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणातून आपलेच भविष्य उज्ज्वलतेची वाट सापडणे आवश्यक असते.
मात्र आज आपल्या शिक्षणाची दिशा बदलली आहे.त्यामुळे शिक्षणाचा हेतू आणि उददीष्टांच्या साध्यतेचा फारसा विचार न करता साक्षरता केंद्रीत शिक्षणावर आपली व्यवस्था केंद्रीत झाली आहे.त्यामुळे शिक्षणाचा व्यापक हेतूचा विचार होताना दिसत नाही.माणूस समाजशील प्राणी आहे.त्यामुळे त्यादिशेने प्रवास होण्यासाठी शिक्षणातून विचाराची पेरणी अपेक्षित आहे.त्यादृष्टीने विनोबा आपल्या शिक्षण विचारातून विद्यार्थ्यांसाठी संदेश देता आहेत.या संदेशामागे विद्यार्थ्याच्या जडणघडणीचा विचार आहे.त्याचवेळी या दिशेने विद्यार्थ्यांनी स्वतःची जडणघडण केली तर राष्ट्र आणि समाजाचे त्यात भले आहे.त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेचा प्रवास हा या विचाराने करण्यासाठी स्वतःच अधिक आग्रही राहण्याची गरज आहे.
विनोबा म्हणतात की, विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असलेल्या प्रत्येकाने आपल्या भविष्याची वाट निर्माण करण्याची गरज आहे. त्या वाटेने तुमच्या आयुष्याचा उद्याचा प्रवास अधिक उज्जवल होणार आहे. वर्तमानात आपले आयुष्य उत्तमतेचा प्रवास घडवत नाही याचे कारण विद्यार्थी दशेत आपण ज्या दिशेने प्रवास करण्याची गरज आहे तो प्रवास घडताना दिसत नाही. विद्यार्थ्यानी शैक्षणिक प्रवासात नेमके काय साध्य करायचे आहे हे सांगताना विनोबानी पाच मार्गाचे दर्शन घडविले आहे. शिक्षणातून शारीरिक,मानसिक,भावनिक विकास साध्य करायचा आहे.त्यानुसार आपल्याला शारीरिक विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचवेळी समाजमनात श्रमाची प्रतिष्ठा देखील प्रस्थापित करायची आहे. विनोबा म्हणतात की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी रोजच किमान एक तास शरीर श्रम करण्याची गरज आहे. आपल्या शिक्षणातून श्रम प्रतिष्ठा यामूल्यांच्या विचाराची पेरणी करण्याची भूमिका प्रतिपादन करण्यात आली आहे.त्यासाठी विनोबा म्हणतात की, प्रत्येक विद्यार्थ्यांने रोजच शारीरिक विकासासाठी एक तास शारीरिक श्रमाची सवय लावण्याची गरज आहे.ही सवय विद्यार्थ्याला आय़ुष्यभर जीवनात श्रम प्रतिष्ठेशी जोडून ठेवील.आज शिकल्यानंतर नोकरी मिळाली की,श्रम करी वर्गाबददलचा विचार आणि श्रमाबददलची प्रतिष्ठा मनातून हरवली जाते.
श्रमाची प्रतिष्ठा मनातून हरवल्याने श्रमकरी वर्गाबददलचा आदर मनातून हरवला दिसतो आहे. श्रमक-यांच्या श्रमाबददलचे मूल्य नसल्याने त्याची किंमत करताना मनाचा कोपरा हळवा होत नाही.शिक्षणातून श्रम प्रतिष्ठा प्रस्थापीत होत नाही याचे कारण शिक्षणात श्रमाचे मोल शब्दात मांडले आहे मात्र, प्रत्यक्षात श्रमाचा विचार प्रतिबिंबीत होताना दिसत नाही.श्रम करण्यासाठी संधी दिली जात नाही,दिली तर विद्यार्थ्यांना ते करावे वाटत नाही.श्रमाला प्रतिष्ठा नसल्याने शिकलेली माणसं श्रमाकडे दूर्लक्ष करतात.त्याचा दुष्परिणाम म्हणून समाजात जे वर्तमान आहे ते जाणवते आहे.श्रमाची सवय लावली गेली तर या देशात बुध्दिजीवी आणि श्रमजीवी असे होणारे विभाजन थांबण्यास निश्चित मदत होईल.समाजातील हे विभाजन आपल्याला इंडीया विरूध्द भारत अशी लढाई करण्यास मदत करते.हे विभाजन समाज व राष्ट्रविकासाला मारक आहे.त्यामुळे आपणच श्रमाचा संस्कार घेऊन शिक्षणाचा प्रवास करण्याची गरज आहे.
विनोबा त्यापुढे जाऊन म्हणतात की, जेव्हा आपण रोज एक तास श्रमाचे काम करू,त्यातून आपणाला निश्चित काहींना काही उत्पन्न मिळेल..ते आर्थिक स्वरूपात असेल किंवा इतर काही स्वरूपातील असेल तर ते उत्पन्न स्वतःसाठी उपयोगात न आणता ते उत्पन्न मिळेल त्यातून समाजाची सेवा घडेल यासाठी ते उत्पन्न उपयोगात आणावे असे पाहावे. त्यामुळे आपले श्रम समाजाच्या विकासासाठी उपयोगात येतील. असे घडल्याने विद्यार्थ्यांच्या अंतकरणात श्रमाचे मोल रूजण्यास मदत होईल. आपल्या श्रमातून जे मिळालेले आहे त्यातून समाजाची सेवा घडेल.एका अर्थाने आपल्या हातून श्रम करताना राष्ट्राच्या विकासासाठी देखील हातभार लागलेला पाहवयास मिळेल. मुळात राष्ट्र,समाजाच्या मदतीसाठी केवळ पैसा देणे पुरेसे नसतो तर वेळ आणि श्रम देखील महत्वाचे असतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यादृष्टीने हा विचार रूजण्यास मदतच होईल.
विनोबा म्हणतात की, आपल्या शिक्षणात सुटट्याचा विचार करण्यात आलेला आहे.त्यामागे मानसशात्राचा विचार आहे.सुटट्यांची गरज आहे.मात्र सुटटी म्हणजे आराम नाही.सुटटीचा उपयोग करत कामात बदलाची अपेक्षा आहे.त्यादिवशी आपण पुन्हा राष्ट्रासाठी श्रम करण्याची गरज आहे.विनोबा शिक्षणातून जी पेरणी करू पाहता आहेत त्यात व्यक्तीच्या विकासाचा विचार आहे. त्याप्रमाणे समाजाच्या विकास विचार देखील त्यांच्या शिक्षण विचारातून सुटत नाही. त्यामुळे सुटटीच्या दिवशी विद्यार्थ्यानी ग्रामीण ,आदिवासी,डोंगराळ भागात जाण्याची गरज आहे.तेथे जाऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. खरतर हा विचार म्हणजे देश व समाज जाणून घेणे आहे.गांधीजी म्हणत असे की,खेड्याकडे चला ,त्यांच्या त्या विचाराच्या पेरणीमागे एक दृष्टीकोन होता.त्या दृष्टीकोनात व्यापकता होती.तीच वाट विनोबा चालण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत करत आहेत.आपण खेडयात गेल्यानंतर तेथील लोक ,समाज जीवन,तेथील समाजाचे आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक जीवन समाजावून घेता येणार आहे.त्यातून आपल्याला देशाची परीस्थिती जाणून घेता येईल.आपल्याला देश समजल्याशिवाय विकासासाठी दृष्टी मिळणार नाही.गांधीजी देशाचे नेतृत्व करण्यासाठी तयार होत असताना गोखले यांनी त्यांना देश फिरून पहा असे सांगितले.गांधीजी त्या मार्गाने गेले.त्याचा परिणाम त्यांनी जो देश पाहिला,त्यातून त्यांना समाजाचे जे विदारक चित्र दिसले. त्या चित्राचे प्रतिबिंब त्यांच्या विचारात अधोरेखित झाले.त्याचा एक चांगला परिणाम गांधीजीच्या धोरणात सातत्याने राहिला.ज्याला नेतृत्व करायचे आहे त्याने देश पाहिला पाहिजे.आपल्या देशातील बहुतांश लोक ग्रामीण भागात राहतात.त्यांचे जीवन आपल्याला जाणता आले पाहिजे.त्याशिवाय उद्याच्या जडणघडणीची मानसिकता निर्माण होताना आपले आयुष्यात त्याचे प्रतिबिंब उमटणार नाही.त्या अर्थाने विनोबा सुटटीचा सदपयोग करण्याचा विचार व्यक्त करता आहेत. त्यामागे केवळ स्वच्छतेची धारणा नाही तर त्या पलिकडचे विनोबा पाहता आहेत.त्यांच्या दृष्टीत विद्यार्थ्यांच्या विकासाची दृष्टी असली तर समाजाचे भले त्यात सामावलेले आहे.
गांधीजीनी जेव्हा देश पाहिला तेव्हा देशात विषमता ठासून भरलेली दिसली.त्यानंतर भेदाभेदही अधोरेखित झाले.हा भेदाभेद नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही.समाजातील भेदाच्या भिंती राष्ट्र विकासाला मारक आहेत.त्यामुळे समाजाच्या विकासाची प्रक्रिया आपोआप मंदावताना दिसते आहे.त्यामुळे या भेदाच्या भिंतीच नष्ट करण्यासाठी शिक्षणातून प्रयत्नाची गरज आहे.त्यादृष्टीने विनोबा म्हणतात की,शालेय जीवनात विद्यार्थ्यी शिकत असताना वर्गात,शाळेत अनेक जाती,धर्माचे विद्यार्थी शिकत असतात.त्यांच्या पंरपरा भिन्न असतात.त्यांच्या जाती,धर्म,भाषा,पंथ भिन्न आहेत.मात्र शाळा हे भेदाभेद विसरून एकत्रित शिकण्याचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे येथेच आपण उत्तम पेरणी केली तर उद्याच्या नागरिकाच्या मनात असणारे भेद नष्ट करणे शक्य आहे.
त्यामुळे विनोबा म्हणतात की,शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने भिन्न जाती,धर्म,पंथ,भाषेचा विद्यार्थी आपला मित्र बनेल असे पाहावे.मित्र बनला की त्याला स्विकारणे घडते.मित्रात मग कोणत्याही प्रकारे भेदाच्या भिंती उभ्या राहत नाही.मैत्रीच्या नात्याला जात,धर्म ,आर्थिक परीस्थिती यांचे बंधन राहत नाही. त्या भिंती तोडून पुढे जाणे घडते. शालेय जीवनात मैत्रीचे बंध तयार झाले तर त्यातून सर्व प्रकारचे भेद संपुष्टात येतील.त्यामुळे माणसं मोठी झाली की,भेदाच्या दृढ होणा-या भिंती या जीवनात पडत गेल्या तर आपल्याला एक चांगला समाज अनुभवता येईल.समाजात निर्माण होणारी एकात्मका आपल्याला एकसंघ राष्ट्र निर्मितीकडे जाता येणार आहे.त्यामुळे विनोबाचा विचार खूप साधा वाटत असला तरी भविष्यासाठी अधिक महत्वाचा आहे.कारण त्यातून राष्ट्र निर्मितीचा विचार आहे.हे लक्षात घ्यायला हवे.
त्याच बरोबर आपल्या देशात विविध भाषा बोलणारी अनेक माणसे आहेत.भाषेतील विविधता हे आपले वैशिष्टये आहे.आपली बोली भाषा प्रत्येकाने जोपासण्याची गरज आहे. मात्र त्याचवेळी देश एकसंघ राखणे,आपल्या विचारांची देवाणघेवाण होणे यादृष्टीने एक भाषा असायला हवी.कारण ती केवळ शब्दांची भाषा नव्हे तर समाजाला व पर्यांयाने देशाला एकसंघ राखण्यासाठीचा विचार आहे.त्यामुळे विनोबा म्हणतात की, सर्वांना एकत्रित बांधणारी एक भाषा असायला हवी.राष्ट्रात अनेक राज्य असली तरी तेथील समाजमनाशी संवादासाठी,विचाराची देवाणघेवान करण्यासाठी उत्तम हिंदी भाषा यायला हवी. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यी देशाच्या कोणत्याही प्रातांत गेले तरी आपले विचाराचे प्रतिपादन करू शकेल.त्यामुळे विनोबांच्या भाषा विचारात समाजाचे एकसंघता आणि एकात्मतेचा विचार आहे .त्यातून आपण अधिक जवळ येण्याची वाट आहे.त्यामुळे आपल्या राज्यात आपली भाषा बोलून समाजाशी संवाद करू पण त्या पलिकडे असलेल्या विविध प्रांताशी संवादासाठी व सर्व देशाला बांधून ठेवणारी भाषा म्हणून हिंदी यायला हवी.
ती देखील चांगली यायला हवी.त्यादृष्टीने विनोबा भाषेकडे पाहतात.एकीकडे या संदेशात व्यक्ती विकासाचा विचार आहे आणि त्याचवेळी समाज व राष्ट्र विकासाची विचार दृढ झालेला अनुभवास येतो.त्यादृष्टीने विनोबा सांगतात की, विद्यार्थ्यांनी सकाळ ,संध्याकाळ रोज अर्थातास व्यायाम करायला हवा.समाजाल निरोगी ठेवायचे असेल तर व्यक्तीचे आरोग्य उत्तम असायला हवे.आज आपल्या देशात व्यक्तीच्या उत्पन्नातील मोठा वाटा व्यक्तीगत आरोग्यावर खर्च होत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे आर्थिक सुबत्तेच्या प्रवासात आरोग्याच्या खर्चाचा अडथळा आहे. मात्र आपले आरोग्य बिघडू नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी .त्यासाठी काही प्रमाणात व्यायाम व अधिक चांगल्या सवयी विद्यार्थी दशेत रूजवण्याची गरज आहे.त्या सवयी रूजल्या गेल्या तर त्यातून उत्तम,निरोगी समाज उभा करता येईल.जेथे व्यक्तीचे आरोग्य उत्तम असेल तर उत्तम विचाराची निर्मितीची अधिक शक्यता असते.त्यामुळे हा व्यक्तीगत संदेश असला तरी त्यात समाजाचे भले आहे हेही लक्षात घ्यायला हवे.
त्यादृष्टीने विनोबा प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतात की,बाबारे रोजच रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे.ही नित्याची सवय बनायला हवी.ते आपल्या जीवनाचे सूत्र व्हायला हवे. त्यामुळे रात्री अभ्यास करण्यापेक्षा ब्रम्हमूर्हतावर अभ्यास करणे कधीही चांगले.सकाळी असलेल्या वातावरणाचा अत्यंत चांगला परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो.शरीराचा थकवा निघून गेलेला असतो.मन शांत झालेले असते.उत्तम एकाग्रहता झालेली असते.त्यामुळे आपण सकाळी अभ्यास केला की स्मरणात लक्षात राहते.विनोबांचा विचार वरवर खुप साधा असला तरी त्यात मानसशास्त्राचा विचार आहे.खरंतर गांधी,विनोबा शिक्षणाविषयी जी भूमिका प्रतिपादन करता आहेत त्यामागे आधुनिक शास्त्राने जे जे म्हणून सिध्द केले ते मानसशास्त्र,अध्ययन शास्त्र,बुध्दिशास्त्र यांचा विचार आहे.कदाचित तेव्हा संशोधनाचा विचार समाजपुढे नसेल पण या विचारात वर्तमाना शास्त्र असल्याचे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे त्याप्रमाणे समाजशास्त्राचा विचार देखील प्रतिबिंबीत झालेला आहे.एका अर्थाने ही वाट चालणे ही केवळ व्यक्तीगत समृध्दतेची वाट नाही तर, त्यापलिकडे असलेल्या समाज विकासाची वाट आहे.त्यामुळे शालेय शिक्षणातील प्रत्येकाने पुस्तकांच्या सोबत चालतांना या विचारांच्या वाटा देखील चालण्याचा प्रयत्न करायला हवा.त्याशिवाय स्वतःचा उध्दार नाही आणि चांगल्या नागरिकांशिवाय समाजाचे भले नाही.
संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)