मुंबई | Mumbai
विरोधी पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात असताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
निवडणुक आयोग काय म्हणतेय?
बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.
Raj Thackeray: “संपूर्ण प्रशासन, यंत्रणा सत्ताधाऱ्यांना…”; राज ठाकरेची उद्विग्न प्रतिक्रिया
मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
निवडणुक आयोगाचे वादग्रस्त निर्णय
राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे यंत्र वापरले जाणार आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते. मग निवडणूक आयोगाने आताच हे मशीन का वापरले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच मुंबईत गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली तेव्हा निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्यानुसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे.





