नाशिक | प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणूक २०२४ साठी प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान केंद्रनिहाय, अधिकारी व कर्मचारी नियुक्तीसाठी महापालिकेला पत्रव्यवहार करण्यात आला असून त्या अनुषंगाने प्रशासन विभागाने खातेप्रमुखांना पत्र पाठवून मनुष्यबळाची संकलित माहीती मागविण्यात आली आहे.
राज्यातील महापालिकेची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत मार्च २०२२ मध्येच संपुष्टात आली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वेळेत निवडणूक घेण्याच्या दृष्टिकोनामधून निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. यापूर्वीची प्रभागरचना रद्द होऊन राज्य सरकारने स्वतः नवीन प्रभागरचना करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आव्हान देण्यात आले होते. त्यावर जवळपास पाच महिन्यापासून सुनावणी सुरू होती. ऑक्टोबर महिन्यातही सुनावणी न झाल्यामुळे पुढील वर्षी अर्थातच २०२४ मध्ये निवडणुकांचा फैसला होईल असेही दावे केले जात आहे. मात्र आता, भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे आता महापालिका निवडणुक होण्याची शक्यता आहे असे चित्र दिसत आहे.
दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने २१ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिक महानगरपालिकेला पत्र पाठवले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने २६ सप्टेंबर २०२३ रोजी महापालिकेला पत्र देऊन अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, त्यांचे केडर व अन्य पुरक माहिती त्यांच्याकडून मागवली आहे.
त्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मनुष्यबळाची जमवा जमव केली जात असून महापालिकेकडून २५ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत माहिती मागवली आहे. त्या अनुषंगाने उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सर्व विभागांना पत्रही पाठवले आहे. या माहीतीच्या आधारावर जिल्हा प्रशासन निवडणूकीची तयारी करण्यात गुंतलेले आहे. मनपा सह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहीती संकलनाचे काम गतिमान करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.