राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, व पालिका निवडणुका आरपीआय आंबेडकर गट पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढविणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असा आदेश राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी दिला आहे.
मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्यासमवेत अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक नुकतीच पार पडली. निकाळजे म्हणाले, आरपीआय आंबेडकर गटाची प्रत्येक तालुक्यात मोट बांधून सर्व जातीधर्मातील घटकांना एकत्र करून सर्वसामान्य व्यक्तीस पक्ष उमेदवारी देण्यास बांधील राहील. गट-तट न करता एकदिलाने काम करून नगर जिल्ह्यात एक आदर्शदायी काम व्हावे, अशी अपेक्षा निकाळजे यांनी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे म्हणाले, दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तळागाळातील कार्यकर्ता आरपीआयशी जोडला जात आहे. चांगल्याप्रकारे ताकद नगर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे सर्व ठिकाणी उमेदवार देऊन त्यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.
यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत दारोळे, रोहित आव्हाड, दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राकेश कापसे, जितेंद्र पाटोळे, तानाजी मिसळे, राजन ब्राह्मणे, पापाभाई बिवाल, प्रदीप मकासरे, संदीप वाघमारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.