अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने 3 हजार 705 मतदान केंद्रांसह आवश्यक ईव्हीएम मशीन आणि मनुष्यबळाचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून टप्प्याने निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 75 गट आणि 150 गणांसाठी प्रभाग रचना प्रारुप आराखडा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता या प्रारुप प्रभाग रचनेवर 21 जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 29 लाख 74 हजार 18 मतदार होते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंत नोंदवलेली मतदारांची यादी ग्राह्य धरुन नियोजन करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
यानुसार 1 जुलै रोजी जिल्ह्यात 30 लाख 6 हजार 816 मतदार आहेत. जिल्हा प्रशासनाकडे सध्या कंट्रोल युनिट (सीयू) 3 हजार 597, बॅलेट युनिट (बीयू) 2 हजार 176, मेमरी चिप्स (डीएमएम) 1 हजार 668 उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आयोगाकडे 478 कंट्रोल युनिट, 1,899 बॅलेट युनिटची मागणी कळवण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी 1 गोडावूनची आवश्यकता आहे.




