जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
महाविकास आघाडी शासनाच्या थकीत पीक कर्जदार शेतकरी कर्जमुक्ती केली जाणार असल्याच्या घोषणेनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती.
वर्षानुवर्षे विकास सोसायट्यांचे कर्ज थकवणार्या कर्जदारांना याचा लाभ मिळाला. तर दुसरीकडे गतवर्षी आक्टोबर 2019 दरम्यान अतीपावसामुळे झालेल्या नुकसानीचे केवळ हेक्टरी आठ हजार तर बागायतीसाठी अठरा हजार रूपयांप्रमाणे तात्पुरती मदत देण्यात आली होती.
यानुसार नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सप्टेबर आक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात मदत देण्याचा शासननिर्णय होवूनही मदत प्राप्त झालेली नाही.
या मदत मिळाल्यास किमान दिवाळी नाहीतर रब्बी हंगामाची खते बियांण्यांची बेगमी करता येईल अशी अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्ष आणि पदाधिकार्यांनी शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफीसह सातबारा कोरा करू, तसेच नियमित कर्जफेड करणार्या शेतकरी कर्जदारांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देउ अशी आश्वासने दिली होती.
त्यानुसार महाविकास आघाडी शासनाने सत्ता स्थापन झाल्यानंतर थकित कर्जदारांना दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली. याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे 1लाख 80 हजारांच्यावर थकबाकीदारांना झाला त्या लाभार्थ्यांना नव्याने कर्ज वितरणाचा लाभ मिळाला.
परंतु नियमित कर्जफेडणारे शेतकरी सभासदांना अजूनही प्रोत्साहनपर अनुदान लाभ मिळाला नाही किवा त्यांच्यासाठी कर्जाच्या रकमेत वाढ देखिल करण्यात आली नाही. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी प्रोत्साहन अनुदान केव्हा मिळेल.
या प्रतीक्षेत आहेत. थकित कर्जदारांची कर्जमाफी केल्याने त्यांना न्याय मिळाला. मात्र, नियमित कर्जदारांनी वेळेवर कर्ज परतफेड करणार्यांंव मात्र अन्याय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
थकबाकीदारांना त्यांची दोन लाखांपर्यंतची थकित कर्जे माफ करण्यात येवून कर्जमुक्ती लाभार्थ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.
परंतु नियमितरित्या कर्जफेड भरून सोसायट्यांना नेहमी सहकार्य करणारे नियमित कर्जदार मात्र दहा ते अकरा महिन्यांचा कालावधी नंतर देखिल अद्यापही 50 हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेतच आहेत.
याचा परिणाम आगामी कर्ज वसूलीवर होउन नियमित कर्जदार देखिल थकबाकीदार होणार असल्याचा अंदाज स्थानिक स्तरावरील विकास कार्यकारी संस्थाकडून व्यक्त केला जात आहे.
याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत जळगाव जिल्हयासाठी 1193.04 लाख रूपयांची मदत सप्टेबर आणि आक्टोबर असे दोन टप्प्यात देण्यात येणार असून यात कोरडवाहूसाठी 18 हजार तर बागायतीसाठी 39 हजार अशी मदत देण्याचा दि. 11 सप्टेंबर 2020च्या शासन निर्णय झाला होता.
ती मदत दिवाळीपूर्वी केव्हा मिळणार याकडे नुकसानग्रस्त शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.