शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राम मंदिराच्या नावाने रान उठवणार्यांची जीभ कथित हज घोटाळा किंवा इतर धार्मिक संस्थांतील कथित गैरव्यवहारांवर का बंद होते? असा थेट सवाल करत राज्याचे मस्त्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शिर्डीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. अभिनेता आमिर खान यांच्यावर लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचा आरोप करत हिंदूंनी त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन त्यांनी केले. खा. संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका करत राज्याच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी टाकली.
मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी मातोश्री निलमताई राणे यांच्या समवेत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी ना, राणे यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानेश सावंत, पोपट शिंदे आदीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. साई दर्शनासाठी मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले. आमिर खान यांच्या तिसर्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आमिर खान यांच्यावर लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचा आरोप केला. हिंदू समाजातील तरुणांनी त्यांच्या चित्रपटांकडे पाठ फिरवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
राम मंदिर दान प्रकरणावर आंदोलन करणार्यांवर निशाणा साधताना ना. राणे म्हणाले, राम मंदिराच्या नावाने आक्रोश करणारे मशिदींतील कथित गैरव्यवहार किंवा कथित हज घोटाळ्याबाबत मात्र गप्प का बसतात? एका धार्मिक संस्थेबाबत प्रश्न उपस्थित करणार्या सर्वच धर्मांतील कथित गैरप्रकाराबाबत समान भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावरही अप्रत्यक्ष टीका करत राम मंदिराच्या मुद्यावर राजकारण करणार्यांनी जनतेसमोर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले. खा. संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत राणे म्हणाले, पूर्वी मातोश्रीत काड्या लावणारे आज भाजपमध्ये काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
ज्यांचा मालक साधा ग्रामपंचायतीचा सरपंच देखील होऊ शकत नाही, ते आज इतरांना राजकारणाचे धडे देत आहेत. अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली. शिर्डीतून मंत्री राणे यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून त्यांच्या आरोपांना उद्धव ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




