नवी दिल्ली | New Delhi
जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला (Terror Attack) झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात देशातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा जणांचा समावेश आहे. या हल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
त्यानंतर आता छत्तीसगडमधील (Chattisgarh) बिजापूर जिल्ह्यातील (Bijapur District) कॅरेगुट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई जिल्हा राखीव रक्षक दल, बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स, राज्य पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि कोब्रा बटालियन यांच्या संयुक्त पथकांनी राबवली असून, गुप्तचर माहितीच्या आधारे ही मोहीम आखण्यात आल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, मोस्ट वॉन्टेड नक्षल कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा याच्यासह इतर महत्त्वाच्या नक्षल नेत्यांची हालचाल या भागात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर व्यापक पातळीवर ही कारवाई (Action) सुरु करण्यात आली.
दरम्यान, आतापर्यंत या चकमकीत घटनास्थळी पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून, अजून काही जखमी नक्षलवाद्यांची उपस्थिती नाकारता येत नाही. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू असून, तीन राज्यांतील २० हजारांहून अधिक सुरक्षा दलाचे जवान या कारवाईत सहभागी आहे. तर सुमारे १ हजार नक्षलवाद्यांना घेरण्यात असल्याची माहिती मिळत आहे.