Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्रातील पाच शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान

- Advertisement -

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक मोबाईल अ‍ॅप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, श्रीमती सुकन्या मुजुमदार यासह वर‍िष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२४ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. शालेय विभागात गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके तर कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्मेल अँड ज्युनिअर कॉलेज मधील चित्रकला शिक्षक सागर बागडे, तर उच्च शिक्षण विभागात पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा.डॉ. शिल्पागिरी प्रसाद गणपुले, आयआयएसइआर पुणे संस्थेतील प्रा. श्रीनिवास होथा तसेच भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशक विवेक चांदलिया या शिक्षकांचा समावेश आहे.

कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेव्दारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिक्षक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम संपूर्ण भारतात आयोजित केला जातो. देशातील शिक्षकांच्या अव्दितीय योगदानाचा गौरव करणे व ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समिर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही, तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द केले आहे, त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारचा उद्देश आहे.

या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी ५० शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील १६ शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या १६
शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र ५०,००० रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या