मुंबई | Mumbai
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
साईरस पलोनजी मिस्त्री यांचा जन्म ४ जुलै १९६८ एका व्यापारी कुटुंबात झाला. त्यांनी मुंबई यथील कॅथेड्रल एवं जॉन कॉनन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी सिव्हील इंजिनियरींगमध्ये बीएस सोबत इंपीरिएल कॉलेज लंडन येथून पदवी घेतली. लंडन येथून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आणि लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी विज्ञान विषयातील पदवी घेतली.
साइरस मिस्त्री हे २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा समूहाचे अध्यक्ष बनले होते. टाटा समूहाच्या कंपनीचे ते अध्यक्ष होते. २०१२ ते २०१६ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. रतन टाटा हे टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर या समूराची सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेतली होती. पुढे २४ ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांना समूहाच्या अध्यक्ष पदावरुन हटवले.