नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरुन राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी तीव्र शब्दांत भूमिका मांडली आहे. कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांनी मुंबई विषयी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे त्यांची कारकिर्द ही वादग्रस्त राहिली होती. त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. असे असले तरी आता भगतसिंह कोश्यारी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामुळे विरोधक भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपवर टीका करताना दिसत आहे. याप्रकरणी आता भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्वयंसेवकांना हा पुरस्कार समर्पित करतो
पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबाबत भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले. मी टीव्ही पाहत नाही किंवा रेडिओ ऐकत नाही. लोकांकडून मला अभिनंदनाचे फोन आले. एका सामान्य कार्यकर्त्याला पद्म पुरस्कार दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आभारी आहे. मला विश्वास आहे की आता आमचे संघ कार्यकर्ते समाजासाठी आणखी निस्वार्थपणे काम करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्याच्या स्वयंसेवकांना हा पुरस्कार समर्पित करत आहे, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.
हे काम करताना कुणाला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करणार?
विरोधकांवर टीका करताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, एखाद्याला जेव्हा असा पुरस्कार मिळतो, तेव्हा तो कुणालातरी समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली जाते. आज मी जो काही आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ स्वयंसेवकांच्या प्रेमामुळेच आहे. त्यामुळे मी म्हणेन की, हा सन्मान आपल्या प्रिय लोकांसाठी आहे. माझी कुणी प्रशंसा करावी किंवा निंदा करावी म्हणून मी काम करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. भारतमाता माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्यासाठी मी काम करत असतो आणि यापुढेही काम करत राहणार आहे. हे काम करताना कुणाला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करणार? असा खोचक सवाल भगतसिंह कोश्यारी यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून मविआचे सरकार उखडून टाकले – राऊत
दरम्यान, महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून मविआचे सरकार उखडून टाकले. त्यांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. हा पुरस्कार संविधानाची हत्या करण्यासाठी दिला आहे का? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.




