मुंबई | Mumbai
मुंबईतील पवई येथे १७ मुलांना ओलीस धरणाऱ्या आरोपी रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर केला. शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यचा संपर्क आला होता, असे केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. दरम्यान, रोहित आर्यने शासनाने कामाचे दोन कोटी रुपये थकवल्याचा आरोप केला होता. यासाठी त्याने दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलनही केले होते. मात्र आता रोहित आर्य याच्या या आरोपांबाबत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित आर्या शिक्षण विभागाकडून थकीत असलेल्या २ कोटी रुपयांच्या रकमेसाठी आंदोलन केले होते. परंतू त्यास यश न आल्याने, घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला कंटाळून त्याने मुलांना ओलीस ठेवले होते. त्याच्या एन्काऊंटरनंतर केसरकर यांनी मी त्याला चेक दिला होता, असे वक्तव्य केले होते. यावर आता टीका होऊ लागताच केसरकर यांनी सारवासारव केली आहे.
काय म्हणाले दिपक केसरकर?
रोहित आर्या याने केलेले काम चांगले होते आणि त्याचे कार्यक्रमही कौतुकास्पद होते, पण मुलांना ओलीस धरणे हे अत्यंत चुकीचे आहे आणि असे होता कामा नये, असे केसरकर म्हणाले. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत रोहित आर्या यांचा मृत्यू झाला याचे अतिशय दुःख आहे. माझ्यासाठी मुलांचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे आणि सुदैवाने पोलिसांनी मुलांची सुरक्षित सुटका केली, असेही ते म्हणाले.
“शासनाकडे कोणाचेही पैसे शिल्लक राहात नाहीत. त्यांच्या बाबतीत असे झाले होते की, त्यांनी एक वेबसाइट तयार केली होती आण त्यावरून मुलांकडून पैसे स्वीकारले होते. त्यामुळे विभागाचे म्हणणे होते की त्यांनी हे पैसे परत करावेत आणि असा प्रकार पुन्हा घडणार नाही असे त्यांच्याकडून लिहून घ्यावे. पण पुढे काय झाले हे मला माहिती नाही कारण मी पुढे शिक्षणमंत्री राहिलो नाही, पण त्यांनी जर त्याची पूर्तता केली असती तर त्यांचे बिल मिळण्यास कुठलीही अडचण असू नये असे मला वाटते.”
“त्यांनी जो हा मार्ग अवलंबला ते पूर्णपणे चुकीचं आहे. मुलांना ओलीस धरणे चुकीचे आहे. मुलं ही अत्यंत कोवळ्या मनाची असतात त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. असं जर झालं तर लोकांना हा एक मार्ग मिळून जाईल. त्यामुळे योग्य वेळी त्याच्यावर प्रतिबंध घातला पाहिजे. त्यांचे जर पैसे येणे असतील तर ते त्यांच्या कुटुंबीयांना कसे लवकरात लवकर मिळतील यासाठी मी प्रयत्न करेन,” असेही दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले.
दोन कोटींच्या थकबाकीचे काय?
दोन कोटींच्या थकबाकीबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले की, “दोन कोटी ही त्यांची थकबाकी नव्हती. आम्ही जी तरतूद करतो ती पूर्ण योजनेसाठी असते. एका व्यक्तीला देण्यासाठीची ही तरतूद नव्हती. त्या गैरसमजापोटी ते असे वागत असतील तर तो त्यांचा केवळ एक गैरसमज होता एवढेच मी सांगेन,” असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
घराबाहेर केलेल्या आंदोलनाबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, “की त्यांनी आंदोलन केले असले तरी मी त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या बैठका देखील घडवून आणल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यामुळे त्याचा आणि या गोष्टीचा संबंध जोडणे चुकीचे आहे. त्यांना जर मदत हवी होती तर त्यांनी थेट संपर्क साधला पाहिजे आणि तशी मदत मागितली पाहिजे. त्यांचे बिल यायला वेळ होता म्हणून मी त्यांना व्यक्तिगत सुद्धा थोडीफार मदत चेकने केली होती, असे केसरकर म्हणाले. शासनाच्या नियमांचे पालन करूनच प्रत्येकाला त्याची बिले मिळत असतात,” असेही केसरकर म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




