Monday, October 21, 2024
Homeनगरगोदावरी नदी तुडूंब, कालवे मात्र बंद!

गोदावरी नदी तुडूंब, कालवे मात्र बंद!

गोदावरीत 12,620 क्युसेकने पाणी || जायकवाडीकडे वाहिले 55.3 टीएमसी पाणी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक परिसर व घाटमाथ्यावर परतीच्या पावसाचे थैमान सुरुच आहे. त्यामुळे गोदावरी नदी 12620 क्युसेंकने जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. या हंगामात नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडी च्या दिशेने गोदावरीतून तब्बल 55.3 टिएमसी पाणी वाहिले आहे. रविवारी सकाळी 6 पर्यंत वाहिले. दरम्यान गोदावरी तुडूंब भरून वाहत असताना गोदावरी कालवे मात्र बंद असल्याने लाभधारकांमध्ये नाराजी आहे.

- Advertisement -

जायकवाडी फुल्ल भरले! त्यामुळे या हंगामात गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सुरू राहण्यास काय अडचण? असा सवाल लाभधारक करत आहेत. गोदावरीला जोपर्यंत पाणी वाहत आहे, तोपर्यंत गोदावरी कालव्यांना पाणी सोडले जावे. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील बंधारे, तळे पूर्ण क्षमतेने भरले जावे. ज्या ठिकाणी पाणी सोडण्याची सोय असेल तेथे पाणी सोडले जावे, असा लाभधारकांचा सूर आहे. अजूनही गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बंधारे रिकामेच आहेत. जलसंपदाने तात्काळ ओव्हरफ्लो सोडावा, अशी मागणी होत आहे. उशीर झाल्यास निवडणूक कार्यात अधिकारी, कर्मचारी जोडले गेल्यास मोठी अडचण होऊ शकते.

सर्वच धरणं 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणाच्या दिशेने येणार्‍या नविन पावसाच्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मुकणे 98.04 टक्के व कडवा 98.22 टक्के हे दोन धरणं वगळता सर्वच धरणांनी 100 टक्के पाणीसाठा राखला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 99.63 टक्के पाणीसाठा आहे. या धरणांपैकी दारणातून 300 क्युसेक, गंगापूरमधून 1019 क्युसेक, आळंदी 30 क्युसेक, वाघाड 25 टक्के, तिसगाव 101 क्युसेक, ओझरखेड 256 क्युसेक, पालखेड 1748 क्युसेक, पुनेगाव 150 क्युसेक, करंजवण 602 क्युसेक, कश्यपी 500 क्युसेक, या धरणांमधून विसर्ग सुरू आहेत. हे पाणी खाली नांदूर मधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत आहे. त्यामुळे या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 12620 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. 1 जूनपासून या बंधार्‍यातून 6 लाख 40 हजार 506 क्युसेक इतका विसर्ग आतापर्यंत सोडण्यात आला आहे. म्हणजेच 55 हजार 359 दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले आहे. हे पाणी 55.3 टिएमसी वाहिले आहे.

काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत धरणांच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आठवडाभरापासून या धरणांच्या परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काही धरणांचे बंद असलेले दरवाजे पुन्हा उघडावे लागत आहेत. गोदावरी कालव्यावरील काल सकाळी 6 पयर्ंंत मागील 24 तासांत कोपरगावला 47 मिमी, पढेगाव 15 मिमी, सोमठाणा 78 मिमी, कोळगाव 32 मिमी, सोनेवाडी 19 मिमी, शिर्डी 70 मिमी, राहाता 58 मिमी, कोळगाव 32 मिमी, रांजणगाव 65 मिमी, चितळी 60 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

नदीला पाणी सुरू आहे, मात्र जलसंपदाने कालवे 10-12 दिवसांपूर्वी बंद केले. कालव्यांद्वारे पाणी सोडले तर बंधारे भरले जातील व शेतकर्‍यांना याचा फायदा होईल. जलसंपदा विभागाने तात्काळ गोदावरी कालव्यांना पाणी सोडावे.
राजेंद्र कार्ले, लाभधारक शेतकरी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या