जिथे जिथे समाजोपयोगी कामे चालतात, समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते तिथे देवाने पाठवलेला त्याचा प्रतिनिधी असतो अशी लोकांची श्रद्धा आहे. ती आचरणातून खरी ठरवणारी काही माणसे महाराष्ट्रातही निर्माण झाली आहेत. पिढी दर पिढी निर्माण होत आहेत. शेगावच्या गजानन महाराज संस्थांनचे अर्ध्वयू शिवशंकर पाटील तथा भाऊ हे त्यापैकीच एक. ते देवमाणूस होते अशीच त्यांच्या सानिध्यात आलेल्यांची, गजानन महाराजांच्या भक्तांची आणि शेगावी भेट देणार्या प्रत्येकाची भावना होती. असा देवमाणूस वयाच्या 82व्या वर्षी देवाकडे परतला आहे.
‘गेले दिगंबर ईश्वर विभूती।राहिल्या त्या कीर्ती जगामाजी। वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी। आता ऐसे कोणी होणे नाही।’ या नामदेव महाराजांनी व्यक्त केलेल्या भावनेचे तंतोतंत मूर्तिरूप म्हणजे शिवशंकर पाटील! अशीच भावना सर्वांच्या मनी दाटली आहे. करोनामुळे त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही याची हळहळ सर्वाना वाटत आहे. असे भाग्य फार थोड्या जणांच्या वाट्याला येते. या देवमाणसाने त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते कमावले होते. वयाच्या अठराव्या वर्षी ते संस्थांनच्या सेवेत रुजू झाले. ती सेवा अध्यक्ष, नंतर विश्वस्त अशा रूपाने अव्याहत सुरु होती. संस्थानची कीर्ती देश-विदेशात पसरली आहे ती त्यांच्यामुळेच! संस्थानच्या कार्याला त्यांनी आकार दिला.
तिथले व्यवस्थापन, स्वच्छता याचा दाखला नेहमीच दिला जातो. भारतातील अनेक गावांसारखे फारसे प्रकाशात नसलेले एक दुर्लक्षित गाव. एका सत्पुरुषाची समाधी हे त्या गावाला प्रसिद्धी देणारे अधिष्ठान देखील तसेच दुर्लक्षित होते. पण अत्यंत त्यागी सेवकांची परंपरा शिवशंकरजींच्या प्रत्यक्ष उदाहरणाने निर्माण झाली व आज शेगाव हे देश-विदेशातील लाखो भाविकांना आकर्षून घेणारे तीर्थस्थान बनले आहे. कोट्यवधी भाविकांच्या दातृत्वामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल संस्थानकडे सतत होत असते. भाऊ यांनी नेहमीच निरलस सेवेचे ब्रीद जोपासले. संस्थानची केंद्र जिथे जिथे आहेत तिथे काम करणार्या सेवकांमध्ये निष्ठा, नम्रता, साधेपणा आणि पराकोटीची श्रद्धा रुजवण्याचे काम त्यांच्या व्यक्तिमत्वाने केले. मूल्ये सांगून रुजत नाहीत किंवा शिकवून समजतीलच असे नाही.
प्रत्यक्ष कृतीतून ती रुजतात. विश्वस्त आणि कार्यकर्तेहीती मूल्ये जोपासतील यावर त्यांनी कटाक्ष ठेवला. संस्थानमध्ये स्वेच्छेने काम करणार्यांना सेवेकरी संबोधले जाते. अशा पद्धतीची विनामोबदला सेवा देणार्यांची प्रतीक्षा यादी देखील खूप मोठी असल्याचे सांगितले जाते. भाऊ यांच्या निस्पृह कर्मयोगाचे इतरांनी घेतलेले असंख्य अनुभव समाजमाध्यमांवर फिरत आहेत. पारदर्शक वर्तन आणि व्यवहार, काटेकोर हिशेब आणि उत्तम व्यवस्थापन ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये होती. करोना रुग्णालय बांधण्यासाठी राज्यसरकारने शेगाव संस्थानला 10 कोटी रुपयांचा निधी दिला होता. रुग्णालय उभारणीनंतर उरलेला निधी संस्थानने सरकारला परत केला. सिटी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष विक्रम पंडित यांनी संस्थानच्या एका प्रकल्पासाठी 700 कोटी रुपये देणगी देऊ केली होती. तथापि भाऊंनी प्रकल्पाचा खर्च फक्त 70 कोटी असल्याचे सांगितले. फक्त तेवढ्याच रकमेची देणंही भाऊंनी स्वीकारली.
शेकडो एकरात पसरलेला शेगावचा आनंदसागर प्रकल्प हा भव्य स्वप्नाला आकार देणारा त्यांच्या दुरदृष्टीचे ठळक स्मारक होय. या प्रकल्पात रोज ते एक फेरी मारत. हातपाय थकल्यानंतर जीपने फिरत. रोजची फेरी कधी चुकली नाही. भाऊंच्या कर्मयोगाबद्दल आणि संस्थानच्या आदर्श कारभाराबद्दल त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यायला हवा अशी भावना खा. सुप्रिया सुळे यांनी भाऊंसमोरच एकदा व्यक्त केली होती. तेव्हा ‘महाराजांनी मला सेवा करायला सांगितली आहे. मी न बोलता सेवा करत आहे’ अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी व्यक्त केली होती. ‘मज पामराशी काय थोरपण’ असे मानणार्या भाऊंनी कोणताही पुरस्कार स्वीकारण्यास होकार दिला नाही. कोणतेही पुरस्कार आणि पैशांशिवाय माणूस म्हणून मोठे होता येते याचे ते उदाहरण होते. असे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व कायमचे वैकुंठधामाला गेले आहे. तथापि त्यांचे कार्य मात्र चिरंतन आहे आणि राहील! त्यांना ‘देशदूत’ची विनम्र श्रद्धांजली!