नवी दिल्ली:
केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांविरुद्ध (New Agriculture Law) सुरू असलेल्या आंदोलनाच्या सहाव्या दिवसाशी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये बोलणी झाली. पण यात काहीच निर्णय होऊ शकला नाही. यामुळे ३ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे.
गेल्या 6 दिवसांपासून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सरकारच्या वतीने चर्चा सुरु करण्यात आली. पण आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार असून ३ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे व सरकारचे प्रतिनिधीत्व असलेली समिती गठीक करण्यावर चर्चा झाली. ही समिती नवीन कृषी कायद्याचा अभ्यास करुन अहवाल देणार आहे.
पंजाबमधून दिल्लीकडे येणाऱ्या सिंघू सीमेवर शेकडो शेतकरी जमलेले आहेत. कृषी कायदे रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. या आधी सरकारने चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र शेतकरी संघटनांनी ते फेटाळून लावलं होतं. त्यामुळे नरमाईची भूमिका घेत सरकारने विनाअट चर्चा करण्याची तयारी दाखवली.