मुंबई | प्रतिनिधी Mumbai
आषाढी एकादशीच्या वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या सुमारे १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. वारकऱ्यांना हे अनुदान सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणार आहे.
वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक समतेची ओळख आहे. लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असतात. वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने २०२४ मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केले असून, त्यामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. यावर्षी आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या १४०० दिंड्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
या अनुदानाचे वितरण मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे आवश्यक प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.




