राहाता |प्रतिनिधी| Rahata
अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्ववत करावे, असे निर्देश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रशासकीय अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या रस्त्यांवर पाणी ओसरताच तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी, अस्तगाव, एकरूखे, चितळी आणि पिंपळवाडी या गावांचा सलग दुसर्या दिवशी दौरा केला. काही गावांमध्ये चारचाकी गाडी जाऊ शकत नव्हती, अशा ठिकाणी त्यांनी दुचाकीचा वापर करून पूरग्रस्त शेती आणि रस्त्यांची पाहणी केली. त्यांच्या या कृतीमुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
या पाहणी दौर्यात अनेक रस्ते वाहून गेल्याचे तसेच काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक थांबली असल्याचे दिसून आले. पाणी साचलेल्या ठिकाणी पाईप नळ्या टाकण्याची आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची सूचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना केली.
जिल्ह्यात सुमारे 3 लाख शेतकर्यांवर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला असून 2 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. राज्य सरकार शेतकर्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असून नुकसानीची आकडेवारी मिळाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशीनाथ गुंजाळ आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.





