अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात आणि मान्सूनपूर्व हजेरीच्या वेळी अतिवृष्टी, वादळी पाऊस आणि पूर यात जिल्ह्यातील 14 तालुक्यात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरदरम्यान 5 हजार 697 घरांची पडझड झालेली असून 22 व्यक्ती मयत झालेल्या आहेत. यासह लहान- मोठे ओढकाम करणारी 1 हजार 59 जनावरे दगावली असून 13 हजार 879 कोंबड्या दगावल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने संकलित करण्यात येत असलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात यंदा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान टप्प्याने अतिवृष्टी, पूर, वादळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाचे प्रमाण नगर दक्षिणेत अधिक असून सर्वाधिक घरांचे नुकसान हे पाथर्डी तालुक्यातील 1 हजार 20 घरांचे झालेले असून त्याखालोखाल जामखेड तालुक्यातील 906 घरांची पडझड झालेली आहे. जिल्ह्यात या पावसात 3 हजार 171 घरांचे अंशत: तर 2 हजार 178 घरांचे नुकसान झालेले असून 6 ठिकाणी संपूर्ण घरांचे नुकसान झालेले आहे. यासह 342 ठिकाणी जनावरांचे गोठे पडलेली आहेत. यासह शेवगाव तालुक्यात सर्वाधिक लहान-मोठ्या ओढकाम करणार्या 418 जनावरे दगावली असून नगर तालुक्यात 292 जनावरे दगावलेली आहेत.
या पावसात नगर 3, अकोले 1, जामखेड 2, कर्जत 1, नेवासा 3, पाथर्डी 3, राहुरी 1, संगमनेर 3, शेवगाव 2, श्रीगोंदा 1, राहाता 2 असे 22 व्यक्ती एप्रिल ते सप्टेंबरदरम्यानच्या पावसाळ्यात मृत पावलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील शेती पिकांसह शासकीय इमारती, रस्ते, शेतकर्यांच्या विहिरी, रस्ते, पूल यांचे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. ही आकडेवारी उपलब्ध झाल्यावर जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या नुकसानीची माहिती समोर येणार आहे. या सर्व ठिकाणी संबंधीतांना पुढील आठ दिवसात म्हणजेच दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा असून यामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी संकलित करण्यात येत आहे.
तालुकानिहाय घरांचे नुकसान
नगर 522, अकोले 142, जामखेड 906, कर्जत 209, कोपरगाव 92, नेवासा 565, पारनेर 101, पाथर्डी 1 हजार 20, राहुरी 396, संगमनेर 227, शेवगाव 921, श्रीगोंदा 249, श्रीरामपूर 84, राहाता 203 अशा प्रकारे 5 हजार 697 घरांचे नुकसान झालेले आहे.
दगावलेली जनावरे
नगर 292, अकोले 14, जामखेड 98, कर्जत 27, कोपरगाव 16, नेवासा 36, पारनेर 26, पाथर्डी 40, राहुरी 13, संगमनेर 30, शेवगाव 418, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 12, राहाता 15 अशा प्रकारे 1 हजार 59 लहान-मोठी जनावरे दगावली असून नगर तालुक्यात 4 हजार 966, जामखेड 205, नेवासा 112, शेवगाव 4 हजार 816, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 12, राहाता 15 अशा 13 हजार 879 कोंबड्या मरण पावल्या आहेत.
कपडे व घरगुती भांड्यांचे नुकसान
जिल्ह्यात 409 कुटूंबाचे कपडे, घरगुती भांड्याचे नुकसान झालेले आहे. यात नगर 26, नेवासा 343, पाथर्डी 40 यांचा समावेश आहे. या कुटूंबांना सरकारच्यावतीने प्रती कुटूंब 5 हजारांप्रमाणे मदत करण्यात येणार आहे.




