अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मागील 24 तासांत अहिल्यानगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांत महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केडगाव व वाळकी येथे प्रत्येकी 100.5 मिमी आणि चास येथे 118.3 मिमी इतका जोरदार पाऊस झाल्याने वालुंबा नदीला पूर आला. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील 45 गावे जलमय झाली असून, नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे 124 घरांची पडझड झाली असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. याशिवाय फळबागा, भाजीपाला, उन्हाळी पिके व चारा पिके मिळून तब्बल 2 हजार 900 हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडले असून, मेहनतीवर पाणी फिरले आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील चास आणि वाळकी मंडलात अतिवृष्टी झाली. खडकी, सारोळा कासार, अकोळनेर आणि वाळकी गावातील नदीकाठच्या शेतकर्यांना झोडपून काढलं. पाहील तिकडे पाणीच पाणी झाले. पाण्याचा वेगही प्रचंड. पाण्याच्या तावडीत सापडलेली माणसे आणि जनावराने जीवाच्या आकांताने धावत होती. यात शेकडो हेक्टरवरील शेतीच नव्हे, तर त्यावरील फळबागाही वाहून गेल्या. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. शेतकर्यांना बचावासाठी कोणतीही मोकळीक दिली नाही. कांद्याच्या अनेक वखारी वाहून गेल्या. शेतात जिकडे तिकडे कांदेच कांदे दिसत होते. शेतकर्यांनी साठवून ठेवलेला सुमारे 12 हजार टन कांदा पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
अतिवृष्टीमुळे फक्त शेतकर्यांचेच नाही तर सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, वीज रोहित्र, तसेच रस्त्यावरील पूल अशा एकूण 61 ठिकाणी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. काही भागांत अजूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले की, प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, सर्व प्रभावित गावांत पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
तसेच मदतीसाठी आवश्यक यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी सरकारकडून त्वरीत आर्थिक मदतीची मागणी केली आहे. विशेषतः शेतकरी वर्गाच्या नुकसानीचा विचार करून पीकविमा, आर्थिक अनुदान आणि पुनर्वसनाची योग्य ती मदत तातडीने मिळावी, अशी मागणी होत आहे. नगर तालुक्यातील परिस्थिती अजूनही गंभीर असून, आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. प्रशासनाच्या मदतीबरोबरच सामाजिक संस्था आणि नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे.
सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
अभूतपूर्व पावसामुळे नगर तालुक्यात प्रचंड नुकसान
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बंधारे फुटले, ओढे व नाले वाहून गेले, शेतीचे मोठे नुकसान झाले, तर काही भागांत जनावरांचीही हानी झाली. या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर तालुक्यातील सोनवाडी, खडकी व वाळकी गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व दिलासा दिला. सरकार या नैसर्गिक संकटात शेतकर्यांच्या व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करण्यात यावेत यासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही ना. विखे पाटील यांनी दिली.
पावसामुळे अनेक ठिकाणी बंधारे, नाले व कालवे फुटले असून, पाण्याचा प्रचंड प्रवाह शेतांमध्ये घुसल्याने शेती जमीन खरडून गेली आहे. काही ठिकाणी जमीन नापीक झाली आहे. मुसळधार पावसामुळे एका रात्रीत 118 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जे यापूर्वी कधीच झाले नव्हते. त्यामुळे पीक, शेतमाल आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही भागांत जनावरे वाहून गेली असून, सद्यस्थितीत चार्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून विखे पाटील यांनी सांगितले की, चारा उत्पादनासाठी अनुदान दिले जात होते, परंतु आता चारा निश्चित दराने खरेदी करून पुरवावा लागणार आहे. पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या हानीबाबतची माहिती गोळा करून मदतीचे प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.नद्यांच्या काठावर व कालव्यांच्या आसपास झालेले अतिक्रमण या आपत्तीला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने अतिक्रमण हटवण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरी भागातील अतिक्रमणाबाबत महापालिकेनेही कठोर धोरण स्वीकारण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाळकी गावातील रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. शेतजमीन व जनावरांचे गोठेही वाहून गेले आहेत. त्यामुळे गावातील जेष्ठ नागरिक व महिलांनी त्यांच्या व्यथा विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या. या संदर्भात विखे पाटील यांनी सांगितले की, पाणी कमी झाल्यानंतर बंधारे, ओढे व नाल्यांचे प्रवाह सुरळीत करण्यासाठी भराव टाकण्यात येतील. यासाठी जलसंपदा विभागाने त्वरित काम हाती घ्यावे. कालच्या घटनेत विविध विभागांनी वेळीच उपाययोजना केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, नगर शहरातील स्लॅब कोसळून झालेला मुलीचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. सर्व विभागांनी सतर्क राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुनिल तुंभारे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पंचनाम्यांचे तातडीने आदेश
या परिस्थितीत पीक व मालाचे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यांचे पंचनामे तातडीने व्हावेत, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व कृषी विभागाला दिल्या. ज्यांच्या नावावर सातबारा उतारावर पिकांची नोंद नाही, अशा शेतकर्यांचेही पंचनामे सद्यस्थिती पाहून करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.