Tuesday, September 17, 2024
Homeदेश विदेशGujarat Floods : गुजरातमध्ये पावसाचे थैमान; २६ जणांचा मृत्यू, तर १८...

Gujarat Floods : गुजरातमध्ये पावसाचे थैमान; २६ जणांचा मृत्यू, तर १८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये (Gujarat) मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असून राज्याच्या अनेक भागात पूर (Floods) आला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका बडौद्याला बसला असून शहरातील काही भागात १० ते १२ फुटापर्यंत सखल भागात पाणी साचले आहे. मागील तीन दिवसांत पाऊस आणि पूरामुळे तब्बल २६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर पूरग्रस्त भागातून १८ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

हे देखील वाचा : “आदिवासी असल्यामुळेच माझ्यावर…”; ऑलिम्पिक धावपटू कविता राऊतचा सरकारवर गंभीर आरोप

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज हवामान विभागाकडून (IMD) १० जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमधील मोरबी, बडौदा, भरूच, जामनगर, अरवली, पंचमहल, द्वारका आणि दांग या जिल्ह्यात प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर आनंद जिल्ह्यात सहा, अहमदाबादमध्ये चार आणि गांधीनगर, खेडा, महीसागर, दाहोड आणि सुरेंद्रनगरमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्याशी फोनवरून चर्चा करत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दरम्यान, पूरातून वाचण्यासाठी अनेक भागात लोकांनी घराच्या छतावर आसरा घेतला आहे.तर बडौदामधील हजारो नागरिकांना एनडीआरएफच्या (NDRF) पथकाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच एसडीआरएफचेही अनेक पथके ठिकठिकाणी बचाव कार्य करत आहेत.

गुजरातमध्ये लष्कर तैनात

काल बुधवारी (दि. २८ ऑगस्ट) रोजी द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदर जिल्ह्यांमध्ये १२ तासांत ५० मिमी ते २०० मिमी पावसाची नोंद झाली. द्वारका येथील भानवडमध्ये १८५ मिमी पाऊस झाला, हा राज्यातील सर्वाधिक पाऊस आहे. हवामान खात्याने आज सौराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफ व्यतिरिक्त, एसडीआरएफ, लष्कर, हवाई दल आणि तटरक्षक दल राज्यात बचाव आणि मदतकार्यात गुंतले आहेत. तसेच ज्याठिकाणी पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे, त्याठिकाणी लष्काराच्या सहा तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत.

धरणे, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

गुजरात सरकारने (Gujarat Government) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १४० जलाशय पूर्ण भरली असून २४ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पूराचे पाणी साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक खंडीत झाली आहे. राज्यातील २०६ धरणांपैकी १२२ धरणांच्या परिसराला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्र्यांना फोन

गुजरातच्या काही भागात अन्यधान्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधत राज्यातील अन्यधान्याच्या साठ्याबाबत माहिती घेतली. तसेच या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी गुजरातच्या पाठीशी आहे, असेही पंतप्रधानांनी आश्वास दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या