मुंबई | Mumbai
ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने (Pakistan) भारतावर हल्ले (Attack) करण्यास सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रातही (Maharashtra) हाय अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह मुख्य शहरांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहविभागाने (Central Home Minister) सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीदरम्यान सर्व विभागांच्या यंत्रणांनी योग्य तयारीत असावे. जिल्ह्यातील विविध महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, अतिमहत्त्वाची ठिकाणे लक्षात घेऊन सर्व यंत्रणांसोबत समन्वयक राखणे आवश्यक आहे.
सर्व विभागांनी २४ बाय ७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेऊन सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. नियंत्रण कक्षात (Control Room) अद्ययावत दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, इंटरनेट, प्रिंटर्स, संगणक व्हिडिओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध ठेवाव्यात. सर्व अग्निशमन अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद, नगरपालिका यांनी उपलब्ध असलेली अग्निशमन वाहने सुस्थितीत असल्याचा अहवाल सादर करावा. पोलीस विभाग/महानगरपालिका यांच्याद्वारे उपलब्ध सीसीटीव्हींचे निरीक्षण बारकाईने करावे. नागरी संरक्षण दल, नाशिक यांनी त्यांच्या अखत्यारितील सायरन (भोंगे) सुरू असल्याबाबत खात्री करावी.
दरम्यान, सदर भोंगे नादुरूस्त असल्यास तत्काळ दुरूस्त करण्यात यावेत. पर्यटन स्थळे, अतिमहत्त्वाची ठिकाणे, धरण परिसरात, गड-किल्ले यांसारख्या ठिकाणांवर आवश्यकतेनुसार निरीक्षण, पाहणी करण्यात यावी. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांचे चित्रिकरण करण्यास, छायाचित्र (Photography) काढण्यास मज्जाव करण्यात यावा. नागरिकांसाठी सूचना फलक लावण्यात यावेत, अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.