नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हाँगकाँगमधील सात इमारती आगीत अक्षरशः जळून खाक झाल्या आहेत. बुधवारी, २६ नोव्हेंबरला साधारणतः दुपारी २ वाजताच्या सुमारास एका उंच इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली. ताई पो जिल्ह्यातील वांग चुक कोर्ट नावाच्या गृहनिर्माण संकुलात ही आग लागली. ज्यात ४४ जणांचा मृत्यू झाला असून २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत, तर अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी एका बांधकाम कंपनीच्या तीन सदस्यांना संशयित मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, २६ नोव्हेंबरला साधारणतः दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही ताई पोतील एका उंच इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तासाभरातच ही आग सात इमारतींमध्ये पसरली गेल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ३ वाजताच्या सुमारास ४ अलार्म फायर घोषित करण्यात आले. ज्यावेळी मोठी आग लागते, तेव्हाच हे फायर अलार्म वाजतात. वाऱ्याच्या वेगाने या आगीने सात इमारतींना आपल्या भक्ष्यस्थानी घेतल्याने यामध्ये आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर २७९ जण अद्यापही बेपत्ता आहेत. ही इमारत रहिवाशी इमारत असल्याने यामधील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सुरुवातीच्या तपासावरून असे दिसून येते की, नूतनीकरणाच्या कामात वापरल्या जाणाऱ्या असुरक्षित बांधकाम साहित्य आणि फोम इन्स्टॉलेशनमुळे आग वेगाने पसरली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही या घटनेची दखल घेतली आहे आणि मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करताना बचावकार्याला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
ताई पो शहरातील ज्या इमारतींना आग लागली, त्या इमारती १९८० च्या दशकात बांधल्या गेल्या होत्या. या सात इमारतींमधील दोन हजार अपार्टमेंटमध्ये सुमारे ४ हजार लोक राहत होते, ज्यात वृद्ध रहिवाशांचाही समावेश होता. येथे काही काळापासून नूतनीकरणाचे काम सुरू होते, ज्यामुळे सर्व इमारती बांधकाम साहित्य आणि बांबूंनी वेढल्या होत्या. यामुळे आग वेगाने पसरली, अशी माहिती हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी दिली. या इमारती जुन्या असल्याकारणाने सध्या त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते.
घटनेनंतर अग्निशमन दलाच्या पथके घटनास्थळी पोहोचली, पण तोपर्यंत आगीने अनेक जण जळून खाक झाले होते. रात्री उशिरापर्यंत केलेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या ७०० हून अधिक लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी एक पथक तयार केले आहे. तर, या घटनेतील बचावकार्य अद्यापही सुरू आहे. अजूनही काही लोक इमारतींमध्ये अडकल्याची शक्यता आहे. धूर, उंची आणि अरुंद पायऱ्यांमुळे बचाव कार्य करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. आग विझविण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी 700 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी सतत काम करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




