मुंबई | Mumbai
राज्यभरात गेल्या 3 – 4 दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भ सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता वाढली आहे. असे असतानाच आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील ४ दिवसांसाठी जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने काय म्हंटले आहे?
अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण तयार झाले असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुसऱ्या बाजूला आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता पुढील दोन दिवसांमध्ये वाढवून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. २७ ऑक्टोबरला हे चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते वायव्य दिशेला सरकून आंध्र प्रदेश, ओडीसा किनारपट्टी जवळ येण्याचा अंदाज आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह महाराष्ट्रात काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो असा इशारा IMD ने दिलाय.
पुढील ४ दिवस या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
26 ऑक्टोबर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर ,परभणी जालना छत्रपती संभाजीनगर,जळगाव व अकोला वाशिम अमरावती यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट .
27 ऑक्टोबर : मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
28 ऑक्टोबर : रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा बीड व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट . उर्वरित सर्व जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता.
29 ऑक्टोबर : संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट .मराठवाड्यातील नांदेड तर तळ कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापुरात पावसाचा येलो अलर्ट.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




