मुंबई | Mumbai
राज्याच्या विविध भागांत गुरुवार (7 सप्टेंबर) पासून जोरदार पाऊस बरसत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. पण आता पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. दोन दिवसांपासून पाऊस बरसत असून पावसाचा हा जोर येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा आणखीच वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये शुक्रवारी तसेच शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग जिल्हांना ‘येलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत पावसाचा जोर (Rain Alert) आणखीच वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान खात्याने मुसळाधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच स्थानिक यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही तास महत्वाचे असणार आहेत.