Sunday, October 6, 2024
HomeUncategorizedमुंबई मेट्रो लाईन-3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

मुंबई मेट्रो लाईन-3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील बहुप्रतिक्षित कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन 3, या मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. या वेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो मध्ये बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास केला.हा प्रकल्प मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ही मेट्रोलाईन पूर्णपणे भूमिगत आहे.मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो 3 ही देशातील पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो आहे जी देशाच्या आर्थिक राजधानीत सुरू झाली आहे.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुंबईच्या एक्वा लाइन मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून मुंबईतील लोक या लाईनची वाट पाहत होते. मी जपान सरकारचे कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या माध्यमातून या प्रकल्पात जपानने भरपूर सहकार्य केले आहे. या सर्व विकासकामांसाठी मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे अभिनंदन करतो.

- Advertisement -

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हा केवळ मराठी आणि महाराष्ट्राचा सन्मान नसून ज्या परंपरेने या देशाला ज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती दिली आहे त्याचा हा सन्मान आहे. त्याबद्दल मी देशातील आणि जगातील मराठी भाषिकांचे अभिनंदन करतो. ते म्हणाले की, महायुती सरकारने 33 हजार कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे सुरू केली आहेत. या विकासकामामुळे मुंबई आणि ठाण्याला आधुनिक ओळख मिळणार आहे.

आज प्रत्येक भारतीयाचे एकच ध्येय आहे ‘विकसित भारत’ त्यामुळे आपल्या सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक संकल्प, प्रत्येक स्वप्न विकसित भारताला समर्पित आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई-ठाण्यासारखी शहरे भविष्यात सज्ज करायची आहेत. त्यासाठी दुहेरी काम करावे लागेल कारण विकासही करायचा आहे आणि काँग्रेस सरकारांची पोकळीही भरायची आहे. पंतप्रधान म्हणाले की, आज एका बाजूला महायुतीचे सरकार आहे, जे महाराष्ट्राचा विकास हे आपले ध्येय मानते. दुसरीकडे काँग्रेस आणि महाआघाडीचे लोक आहेत, त्यांना संधी मिळाली की विकासकामे थांबवतात असे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा 12 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा आहे, जो आरेला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला जोडतो. या अगदी नवीन मेट्रो मार्गाची वारंवारता साडेसहा मिनिटांची असेल आणि ती 10 स्थानके कव्हर करेल.सध्या, 9 ट्रेन धावतील ज्यात 96 फेऱ्यांच्या सेवांचा समावेश असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या