नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आशिया कपमध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज क्रिकेट सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री ८ वाजता सामना सुरू होईल. मात्र या सामन्यावरुन भारतात संतापाचे वातावरण आहे. या सामन्याला राजकीय रंगही देण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यात भारताच्या २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही तुम्ही पाकिस्तानविरोधात सामना कसा खेळत आहात? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आजच्या सामन्याबाबत भारतीय संघही संभ्रमात असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही? असा संभ्रम भारतीय क्रिकेटपटूंसमोरही आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर स्टाफसोबत खेळाडूंची चर्चा झाली. व्यावसायिक राहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पाहा, असा सल्ला टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघ पहिल्यांदाच आमनेसामने येत आहे. हा सामना रद्द करण्याची मागणी भारतात अनेकांनी केली आहे. वृत्तपत्राच्या बातमीनुसार, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमध्येही पाकिस्तानविरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याबाबत मतभेद आहेत. आजचा सामना खेळावा की नाही, याबाबत खेळाडूंमध्ये यावर संभ्रम आहे. ड्रेसिंग रूममध्ये यावर गंभीर चर्चा झाली. प्रशिक्षक गौतम गंभीर याने खेळाडूंना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिलाय.
सामन्याला राजकीय रंग
भारत-पाकिस्तान संघादरम्यान आज आशिया कपमध्ये सामना खेळला जाणार आहे. या सामन्यावरुन भारतात संतापाचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये २६ निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून या सामन्याला कडाडून विरोध करण्यात आला आहे. आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान यावर काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहिदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी औकातीत राहावे, असा इशाराही त्यांनी दिलाय.
खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. टीम इंडियाला आजचा पाकिस्तान विरोधातील सामना खेळायचा नाही. पण त्यांच्यावर जय शाह यांचा दबाव आहे. काही खेळाडूंसोबत आमची चर्चा झाली आहे. पण त्यांची मजबूरी आहे. अनेक माजी खेळाडूंनी हा सामना खेळू नये, असा सल्ला दिला. पण जय शाह यांचा त्यांच्यावर दबाव आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना आज संध्याकाळी ८ वाजता होणार आहे. दोन्ही संघाने पहिला सामना जिंकला आहे. आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लगलेय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




