Tuesday, January 6, 2026
Homeक्रीडाT20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; शुबमन गिल बाहेर, अक्षर...

T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; शुबमन गिल बाहेर, अक्षर पटेलकडे मोठी जबाबदारी

दिल्ली । Delhi

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी २०२६ च्या टी२० वर्ल्ड कप आणि त्यापूर्वी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघ निवडीत निवड समितीने काही धाडसी निर्णय घेतले असून, युवा फलंदाज शुबमन गिलला संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची पदोन्नती करत त्याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी२० मालिका टीम इंडियासाठी ‘लिटमस टेस्ट’ मानली जात आहे. बीसीसीआयने हे स्पष्ट केले आहे की, न्यूझीलंडविरुद्ध जो संघ मैदानात उतरेल, तोच संघ वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. यामुळे या मालिकेतील कामगिरी खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

YouTube video player

निवडलेल्या १५ सदस्यीय संघात एकूण तीन मुख्य बदल करण्यात आले आहेत. सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे सलामीवीर शुबमन गिलला संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा कुटणाऱ्या इशान किशनला संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसनसह आता इशान किशनही संघात असेल.

तसेच, दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकलेला अक्षर पटेल आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. केवळ संघात पुनरागमनच नाही, तर त्याला उपकर्णधार बनवून संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जितेश शर्मा आणि शाहबाज अहमद यांना या संघातून वगळण्यात आले असून रिंकू सिंहने आपले स्थान कायम राखले आहे.

टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंह, इशान किशन (यष्टीरक्षक).

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेचे वेळापत्रक:

वर्ल्ड कपपूर्वी होणारी ही मालिका २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे:

  • २१ जानेवारी: पहिला टी२०, नागपूर
    २३ जानेवारी: दुसरा टी२०, रायपूर
  • २५ जानेवारी: तिसरा टी२०, गुवाहाटी
  • २८ जानेवारी: चौथा टी२०, विशाखापट्टणम
  • ३१ जानेवारी: पाचवा टी२०, तिरुवनंतपुरम

२०२६ च्या टी२० वर्ल्ड कपचे यजमानपद संयुक्तपणे भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून अंतिम सामना २० मार्च रोजी खेळवला जाईल. भारत ‘गट अ’ मध्ये असून त्यात पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे.

भारताचे गट फेरीतील सामने:

  • ७ फेब्रुवारी २०२६: भारत वि. अमेरिका (मुंबई)
  • १२ फेब्रुवारी २०२६: भारत वि. नामिबिया (दिल्ली)
  • १५ फेब्रुवारी २०२६: भारत वि. पाकिस्तान (कोलंबो, श्रीलंका)
  • १८ फेब्रुवारी २०२६: भारत वि. नेदरलँड्स (अहमदाबाद)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...