नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतचा दौरा केला. यावेळी त्यांनी नौसैनिकांचा उत्साह वाढवला. नौसैनिकांसोबत अधिकाऱ्यांशी ऑपरेशन सिंदुरच्या यशाबद्दल चर्चा केली. “आज INS विक्रांतवर माझ्या नौसैनिक वॉरियर्समध्ये येऊन मला आनंद होत आहे. भारताची समुद्री ताकत INS विक्रांतवर मी उभा आहे, त्यावेळी माझ्या मनात आनंद, गर्व आणि विश्वासाची भावना आहे. जो पर्यंत भारताच्या समुद्री सीमांची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तो पर्यंत कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.
यावेळी भारतीय नौदलाने अरबी समुद्रात शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर युद्धनौकेवर आयोजित एका कार्यक्रमाद्वारे राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या जवानांना संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी नौदलातील जवानांच्या शौर्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “भारतीय नौदलाने पूर्ण क्षमतेने कारवाई केली तर पाकिस्तानचे चार तुकडे होतील”.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
राजनाथ सिंह म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय नौदलाने कोणताही गाजावाजा न करता केलेल्या कामगिरीद्वारे प्रत्येक भारतीयाला प्रभावित केले आहे. आपल्या सैन्याने अत्यंत शांत राहून पाकिस्तानी लष्कराला बांधून ठेवण्यात यश मिळवले आहे. जो शांत राहूनही एखाद्या देशाच्या लष्कराला बाटलीत बंद करून ठेवू शकतो तो जेव्हा बोलू लागेल तेव्हा काय चित्र असेल याची कल्पना करा”.
Interacting with India’s brave Naval warriors aboard INS Vikrant. https://t.co/iu5Wptyu3o
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 30, 2025
“मी तुम्हाला सर्वांना ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या शुभेच्छा देतो. पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले, तेव्हा आपल्या सैन्यदलांनी ज्या गतीने आणि स्पष्टतेने कारवाई केली, ते अद्भुत होते. याने फक्त दहशतवाद्यांनाच नाही, तर त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांना सुद्धा स्पष्ट संदेश गेलाय, भारत आता सहन करणार नाही. भारत आता थेट उत्तर देतो. या संपूर्ण इंटेग्रेटेड ऑपरेशनमध्ये नौदलाची भूमिका गौरवशाली होती. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी जेव्हा एअरफोर्सने पाकिस्तानी भूमीवर दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. त्यावेळी अरबी समुद्रात तुमची आक्रमक तैनाती, मॅरिटाइम डोमेन अवेयरनेस आणि समुद्री वर्चस्वाने पाकिस्तानी नौदलाला त्यांच्या तटावरच उभे राहण्यास भाग पाडले. ते खुल्या सागरात येण्याची हिम्मतही करु शकले नाहीत” असे राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षण मंत्री म्हणाले, “यावेळी पाकिस्तानी सैन्याला आपल्या फायर पॉवरचा सामना करावा लागला नाही. मात्र, जगाला माहिती आहे की पाकिस्तानने यावेळी कुठलीही नापाक हरकत (आगळीक) केली तर कदाचित त्यांच्याविरोधात भारतीय नौदल ओपनिंग करू शकते”. म्हणजेच, यावेळी भारतीय वायूदल किंवा भूदलाच्या आधी भारतीय नौदल पाकिस्तानविरोधात रणशिंग फुंकू शकते”.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा