नवी दिल्ली |New Delhi – लडाखच्या गलवान खोर्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर चीनला झटका देण्याचे सत्र भारताने सुरुच ठेवले आहे. आता भारतीय रेल्वेने चीनच्या बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाईन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन या चिनी कंपनीला (Chinese Company) दिलेले 471 कोटींचे कंत्राट रद्द केले आहे. भारतीय रेल्वने पूर्व मालवाहू मार्गिकेच्या संकेत दिव्यांचे व दूरसंचारविषयक कामाचे कंत्राट चिनी उद्योग समूहाला दिले होते. ते आता रद्द करण्यात आले आहे.
या समूहाच्या कामाची गती अतिशय मंद असल्याचे कारण पुढे करून हे कंत्राट रद्द करण्यात येत असल्याचे भारतीय रेल्वेने(Indian Railways) स्पष्ट केले आहे. हे काम कानपूर आणि मुगलसराय यादरम्यान मार्गिकेच्या मोठ्या भागात केले जाणार होते. डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (डीएफसीसीआयएल DFCCIL) व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी ही माहिती दिली. हे कंत्राट रद्द करण्याचे पत्र जारी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
ही कंपनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अॅण्ड डिझाईन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल ण्ड कम्युनिकेशन या समूहाला 14 दिवसांची लेखी सूचना दिल्यानंतर हे कंत्राट रद्द केल्याचे पत्र दिले आहे. या समूहाला 2016 मध्ये 471 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. चिनी कंपनीला या योजनेतून बाहेर काढण्याचे काम जानेवारी 2019 मध्येच सुरू करण्यात आले होते. ही कंपनी हे काम योजून दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्यास सक्षम नव्हती, असा भारतीय रेल्वेचा स्पष्ट आरोप आहे.
चिनी समूहाने फक्त 20 टक्केच काम पूर्ण केले आहे. या समूहाला दिलेले कंत्राट रद्द करण्याची माहिती जागतिक बँकेला एप्रिल महिन्यातच दिली होती. जागतिक बँक या योजनेसाठी आर्थिक मदत करीत आहे. समूहाच्या मंद गतीमुळे ही योजना कार्यान्वित होण्यात मोठा उशीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे सचान यांनी सांगितले.
https://deshdoot.com/others/national-international/chinese-company-in-court-against-indian-railways