शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
श्रद्धेची आणि शांततेची नगरी समजली जाणारी शिर्डी पुन्हा एकदा रक्ताळली असून शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बुधवारी दिवसाढवळ्या एअरपोर्ट रोडवर इन्स्टाग्रामवरील मुलींच्या मैत्रीच्या वादातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर तिघांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेमुळे शिर्डी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वर्ष संपायला अवघे 10 दिवस शिल्लक असतानाच या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्णनगर येथील रहिवासी नीरज संजू चौधरी (वय 17) याची आणि आरोपी सुमित गुंजाळ, रोहित कोळगे व त्यांच्या एका साथीदाराची संगमनेर येथील तीन मुलींशी इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली होती. याच मुलींच्या वादाचे पर्यवसान बुधवारी रक्तरंजित संघर्षात झाले. शिर्डी अग्निशामक केंद्राजवळ आरोपींनी नीरजवर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात नीरज गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी पदभार घेतल्यापासून शिर्डीला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली होती. मात्र या एका घटनेने पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फेब्रुवारीमधील दोन हत्याकांड आणि दहीहंडी उत्सवातील मर्डरनंतर आता थेट चाकूने सपासप वार करण्याचे प्रकार सुरू झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गलांडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निवांत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली असून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनेनंतर माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर यांनी जखमी नीरजच्या कुटुंबाला धीर दिला. यावेळी बोलताना त्यांनी पालकांना मोलाचा सल्ला दिला. साईबाबांच्या शिकवणीनुसार रुग्णसेवा करणे आमचे कर्तव्य आहे, पण आता प्रत्येक पालकाने आपल्या मुला-मुलींवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरील एका चुकीच्या मैत्रीमुळे आई-वडिलांना न भरून येणारा त्रास सोसावा लागत आहे, असे आवाहन त्यांनी केले.




