बेलपिंपळगाव|BelPimpalegav
केवळ आठवी उत्तीर्ण झालेला, रानोमाळ शेळ्या चारणारा युवक रोजगाराच्या हेतूने मुंबईला गेला. अडीच हजार रुपये महिना पगारावर खासगी सिक्युरिटीची नोकरी करू लागला. अन् पुढे बॉलीवूडच्या तारे-तारकांचा अंगरक्षक म्हणून संधी मिंळाली. वेगवेगळ्या देशांत तो फिरला अन् लाखो रुपयांची कमाई करू लागला. हिंदी चित्रपटाचे हे कथानक नाही, तर ही आहे नेवासा तालुक्यातील गोदाकाठच्या जैनपूर गावातील एक़ा युवकाच्या आयुष्याची खरी कहाणी.
नेवासा तालुक्यातील गोदावरीच्या तीरावर असलेल्या जैनपूर येथील मच्छिंद्र पांडुरंग शिरसाठ शिक्षण अवघे 8 वी पास. ज्याला शालेय जीवनात कधीही रस वाटला नाही. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने घरातील शेळीपालन करण्यासाठी रोज रानोमाळ भटकणारा हा युवक आज लाखो रुपये महिना कमवत आहे.
प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केल्यावर पाचवी व सहावीला श्रीरामपूर तर सातवी व आठवीचे शिक्षण अहमदनगर येथे केले. चार भिंतीच्या शाळेत फारसे डोके चालत नसल्याने शाळा सोडली. कुटुंबातील व्यक्तींनी त्याला घरच्या शेळ्या चारण्याचे काम दिले. पण यात त्याचे मन रमणारे नव्हतेच. नोकरीच्या शोधात 2005 साली त्याने मायानगरी मुंबई गाठली. तब्यत चांगली असल्याने त्याला मुंबई येथे एका खासगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये अवघ्या अडीच हजार रुपये प्रति महिना पगारावर नोकरी मिळाली.
शिक्षण कमी, शहराचा अनुभव नाही पण मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर एक एक पाऊल टाकत हळूहळू आपला पाय रोवून मोठ्या जिद्दीने काम मिळवत गेला. 2008 साली बॉलिवूड अभिनेत्री व अभिनेता यांना सिक्युरिटी असणार्या एका एजन्सीमध्ये तुटपुंज्या पगारावर काम मिळविले. त्यात बॉलिवूड मधील महानायक अमिताभ बच्चन, अजय देवगण, ऐश्वर्या रॉय, हेमामालिनी, करिना कपूर, अमीरखान, सैफअली खान अशा मोठमोठ्या कलाकारांच्या सिक्युरिटीचे काम मोठ्या आवडीने सुरू ठेवले. यातून त्यांनी मोठ्या खडतर कष्टाने 2015 ला मुंबई शहरात स्वतःची सिक्युरिटी एजन्सी करण्याचे ठरवले.
त्यानंतर प्रीती झिंटा, बिपाशा बसू तसेच टायगर श्रॉफ यांच्यासाठी अनेक दिवस बॉडीगार्ड म्हणून जबाबदारी सांभाळली. आयपीएल काळात त्यांनी प्रीती झिंटा हिच्याकडे अनेक वर्षे बॉडिगार्ड म्हणून काम केले.
2005 ते 2020 या कालखंडात खडतर मेहनत घेतली आणि 2015 पासून ते आजपर्यंत त्यांची स्वतःची ‘ऑल एक्सेस सिक्युरिटी अँड फॅसिलिटी’ नावाने बॉलिवूड क्षेत्रात सिक्युरिटी एजन्सी सुरू केली.
जो ग्रामीण भागातील अडाणी तरुण काम पाहण्यासाठी मुंबईला गेला तो आज स्वतःच्या सिक्युरिटी एजन्सी मध्ये किमान 50 ते 55 तरुणांच्या हाताला चांगले काम दिले. आज या मोठ्या पदावर जाताना अनेक मित्रांनी त्याला मोलाचे सहकार्य केले असल्याचे मच्छिंद्र शिरसाठ आवर्जुन सांगतात.
आज मच्छिंद्र शिरसाठ हे स्वतः बॉलिवूड सुपरस्टार टायगर श्रॉफ यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करत आहेत. त्यांच्या एजन्सी मार्फत टायगर श्रॉफ, प्रीती झिंटा, बिपाशा बासू, दिया मिर्झा, रणवीर सिंग, दिशा पटानी, नेहा शर्मा, सारा अली खान, मनोज वाजपेयी, निधी अग्रवाल, राजकुमार राव, शामिता शेट्टी यांसह अनेक नामवंत कलाकारांना सिक्युरिटी पुरवली जात आहे.
हे काम करत असतानाच मच्छिंद्र शिरसाठ यांना सुपरहिट ‘बागी 2’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि एक ग्रामीण भागातील तरुण बॉलिवूड च्या मोठ्या पडद्यावर देखील स्वकष्टाने चमकला. या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्याला शिक्षणात साधी मराठी भाषा जास्त जमत नसायची तो आज मराठीच नाही तर इंग्रजी तसेच अनेक भाषेत तरबेज आहे. 2005 पर्यंत जिल्हा सोडून कुठे न गेलेले शिरसाठ आज मात्र जगातील अनेक देशांच्या वार्या करून आले आहेत. त्यांचं जैनपूर, बेलपिंपळगाव व परिसरातील गावात मोठे कौतुक होत आहे.