नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात शनिवारी (दि.९ ऑगस्ट) सलग नवव्या दिवशी चकमक सुरु आहे. काल रात्रभर या परिसरात मोठे स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. दहशतवादी आणि भारतीय सुरक्षादलाच्या या चकमकीत भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद झाले, तर दहा जवान जखमी झाले आहेत. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सध्या सुरक्षा दल कुलगाममधील दुर्गम जंगल परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि इतर सर्व आवश्यक साधनांचा वापर करत आहे. ही चकमक अद्यापही सुरू असून, परिस्थितीवर सैन्याचे बारीक लक्ष आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्याने मोठी मोहिम हाती घेतली आहे. कुलगामच्या अखाल भागात दहशतवाद्यांशी चकमकीचा आजचा सलग नववा दिवस आहे. रात्रभर या भागात गोळीबाराचा आवाज ऐकायला येत होता. या चकमकीत दोन जवान शहीद झाले तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. लान्स नाईक प्रितपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग हे शहीद झाले आहेत.
चिनार कॉर्पने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची पुष्टी केली आहे. पोस्टमध्ये म्हटले की, ऑप अखल, कुलगाम… चिनार कोर राष्ट्रासाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या वीर लेफ्टनंट कर्नल प्रीतपाल सिंग आणि सिपाही हरमिंदर सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली अर्पित करते. त्यांचे शौर्य आणि समर्पण आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. #भारतीयसेना शोकाकुल कुटुंबियांप्रती गहन सहवेदना व्यक्त करते आणि त्यांच्या दुखात सहभागी आहे.”
आतापर्यंत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. या जंगल भागात नैसर्गिक गुहांचा आधार घेत कमीतकमी तीन ते चार दहशतवादी लपलेले आहेत. गेल्या ९ दिवसांपासून हे दहशतवादी सैन्यावर गोळीबार करत आहेत. यावरून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दारुगोळा असल्याचे समोर येत आहे.




