राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोटात पावसाचे जोरदार आगमन होत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धरणामधील विसर्ग वाढल्याने नांदुर मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल रात्री 9 वाजता 18,403 क्युसेसपर्यंत वाढविण्यात आला. त्यापूर्वी तो 15,775 क्युसेस होता. काल सकाळपर्यंत 1 जूनपासून गोदावरीत 34 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान जायकवाडी धरणात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्त साठा 80.72 टीएमसी इतका झाला आहे.
दारणा धरणाच्या पाणलोटात काल जोरदार आगमन होत होते. परवा झालेल्या पावसाने दारणा धरणात जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली. यामुळे दारणा धरणातून 7,806 क्युसेसने विसर्ग करण्यात येत आहे. काल सकाळी मागील 24 तासांत घोटी येथे 67 मिमी, दारणा धरणाच्या भिंतीजवळ 38 मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरीलाही पावसाचा जोर कायम आहे. भामच्या भिंतीजवळ 65 मिमी, भावलीच्या भीतीजवळ 99 मिमी पावसाची नोंद झाली. वाकीला 62 मिमी पावसाची नोंद झाली. दारणात पाणीसाठा काल सकाळी 85.50 टक्के इतका होता. नवीन येणार्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. दारणातून 11559 क्युसेक समूहातील भाममधून 3,252 क्युसेक, भावलीतून 1,218 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भाम आणि भावली दोन्ही प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. वाकी 88.26 टक्क्यांवर स्थिर आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाचे समाधानकारक आगमन होत होते. गंगापूरच्या पाणलोटात काल सकाळपर्यंत मागील 24 तासांत आंबोलीला 102 मिमी, त्र्यंबकला 76 मिमी, गंगापूर धरणाच्या भिंतीजवळ 47 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपीला 50 मिमी, गौतमी गोदावरीला 51 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणात सकाळी मागील 24 तासांत 226 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. गंगापूरचा पाणीसाठा 67.63 टक्क्यांवर पोहचला आहे. या धरणातून काल विसर्ग सोडण्यात आलेला नाही. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत या 12 तासात गंगापूरला 12 मिमी, कश्यपिला 11 मिमी, गौतमीला 51 मिमी पावसाची नोंद झाली. तर त्र्यंबकला 9 मिमी, आंबोलीला 34 मिमी पावसाची नोंद झाली.
वालदेवी धरणातून 241 क्युसेस, आळंदीतून 243 क्युसेस, कडवातून 2458 क्युसेस, वाघाडमधून 54 क्युसेस, विसर्ग सुरू आहे. वरील सर्व धरणांचे विसर्ग नांदुरमधमेश्वर बंधार्यात दाखल होत आहेत. त्यामुळे काल सायंकाळी 6 वाजता या बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 15775 क्युसेस, विसर्ग सुरू होता. काल सकाळपर्यंत या बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 34 टीएमसी हून अधिक पाणी वाहून गेले आहे. जायकवाडीत काल शनिवारी सायंकाळी 6 वाजता उपयुक्त पाणी साठा 80.72 टक्क्यांवर पोहचला. या धरणात मृतसह एकूण पाणी 87.9 टीएमसी इतका झाला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा 61.8 टीएमसी इतका झाला आहे. काल सायंकाळी 6 वाजता या जलाशयात 14803 क्युसेस,विसर्ग दाखल होत होता.




