Saturday, October 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजदत्तक नाशिकची आश्वासन पूर्तता करण्यात महायुती अयशस्वी - जयंत पाटील

दत्तक नाशिकची आश्वासन पूर्तता करण्यात महायुती अयशस्वी – जयंत पाटील

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक (Nashik) दत्तक घेतले होते. नाशिककरांना दिलेल्या आश्वासनाची अद्यापपर्यंत पूर्तता करण्यात महायुती सरकार अयशस्वी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) तर्फे राज्यभर शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा काल (दि.२३) नाशिकमध्ये होती. या निमित्ताने आयोजित मेळाव्याप्रसंगी पाटील बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, २०१७ साली नाशिकला दत्तक घेणार्या फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की, निओ मेट्रो नाशकात येईल, आयटी पार्क येईल, तसेच स्मार्ट सिटी सारखा प्रकल्प नाशकात आणून तो फेल झाल्याचे सर्वांना समोर दिसतच आहे. नाशिकमध्ये येणारे सर्व प्रकल्प हे इतरत्र पळवण्यात आले. नाशिकच्या आयटी क्षेत्रामध्ये तज्ञ असलेल्या मुलांना आयटी पार्क नसल्यामुळे मुंबई ,पुणे, दिल्ली ,बेंगलोर अशा ठिकाणी नोकरी करता जावे लागत असल्याने नाशिककरांच्या पदरी अद्याप पर्यंत घोर निराशा आली आहे. नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने कसारापर्यंत येणारी लोकल नाशिकपर्यंत येणार होती असे त्यांनी आश्वासित देखील केले होते ती यायला सुरुवात झाली का ? असा खोचक सवाल देखील यावेळी त्यांनी विचारला.

पुढे बोलताना पाटील यांनी बदलापूर (Badlapur) येथील घटनेबाबत देखील भाष्य केले. ते म्हणाले की, बदलापूर प्रकरणातील संशयिताचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची आधी बातमी आली, त्यानंतर त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी काही वेळातच आली. सदर संशयिताला फाशीच दिली पाहिजे असे आमचे मत आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये दोषी असलेले संस्थाचालक व पीडीतेच्या आई-वडिलांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. तसेच नाशिक पोलिसांचे जे धाडस झाले नाही ते धाडस मुंबई पोलिसांनी करून दाखवले ते मुंबई पोलिसांनी नाशकातील एमडीचा कारखाना उध्वस्त करून दाखवले सध्या नाशिकमध्ये राजरोसपणे खून सत्र सुरू आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे नाही का ? असेही जयंत पाटील यांनी म्हटले.


तर खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) म्हणाले की, राज्यातील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कुणी आवाज उचलला. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली पण लाडकी बहीण सुरक्षित कधी होणार. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नागपुरात गेल्या २४० दिवसात २१३ महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यात यावरून काय समजावे. सध्या राज्यातील पालकमंत्री हे मालकमंत्री झाले आहेत, असे त्यांनी म्हटले. यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहर जिल्हा सरचिटणीस मुन्ना अंसारी ,माजी आमदार हेमंत टकले, नितीन भोसले,रोहिणी खडसे, उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभाग अध्यक्ष छबू नागरे, गोकुळ पिंगळे, जगदीश गोडसे आदींसह विधानसभेसाठी इच्छुक असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या