Tuesday, June 17, 2025
HomeनगरKarjat : साहेब, आम्ही शाळेत जाणार कसे ?

Karjat : साहेब, आम्ही शाळेत जाणार कसे ?

विद्यार्थ्यांची प्रशासनाला आर्त हाक || रस्ता खुला करण्याची मागणी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

साहेब, आम्ही शाळेत कसे जाणार? अशी आर्त हाक कर्जतमधील शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिली आहे. गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असून पाण्यामध्ये अनेक वेळा सर्पांचे दर्शन होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, कर्जत तालुक्यातील चिंचोली गावठाण ते मोरे वस्ती आणि खंडाळा येथील गोयकरवाडी या भागांना जोडणारा जुना रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत वाईट स्थितीत आहे. सन 2022 मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर कारवाई करत ऑक्टोबर 2022 मध्ये तहसीलदारांनी रस्ता ग्रामस्थांना देण्यासाठी खुला करावा असा आदेश दिला होता.

- Advertisement -

आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आलेल्या तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना काही स्थानिक नागरिकांनी विरोध करत वाद घालून काम थांबवले. तेव्हापासून आतपर्यंत महसूल प्रशासनाला हा रस्ता खुला करता आलेला नाही. या रस्त्याचा वापर महिला, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व वृद्ध व्यक्ती ये-जा करण्यासाठी पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते आणि प्रवास जीवघेणा ठरतो. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर वेड्या-बाभळीच्या झाडांनी अडथळा निर्माण केला आणि रस्ता पूर्णपणे बंद झाला. अनेक महिला शेतातून परतताना या झाडांमध्ये अडकून पडल्या होत्या. पाठीमागून ट्रॅक्टर आल्यामुळे त्यांना घरी जाता आले.

शेतामध्ये जाणार्‍या अनेक महिला या परिसरामध्ये खराब रस्त्यामुळे व पाण्यात पडून जखमी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पाण्यात साप दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले, आणि काही विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागली. गुडघाभर पाण्यातून या विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात वेड्या बाभळी आहेत. यामधून अनेक प्राणी रस्त्यावर येतात. रात्रीच्या वेळी अंधारात या रस्त्याने प्रवास करणे खूप धोकादायक झाले आहे.

यामुळे या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला असूनही अद्याप कुणीही दखल घेतलेली नाही. या भीषण परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पाण्यात बसून घोषणाबाजी केली. राज्य सरकारने व महसूल मंत्र्यांनी अशा रस्त्यांबाबत कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, असे येथे दिसून येते. त्यामुळे प्रांताधिकारी व तहसीलदार या रस्त्यासाठी काय भूमिका घेतात, याकडे आता सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. यावेळी योगेश मोरे, हर्षल मोरे, शेखर मोरे, अविनाश काका, शिवाजी मोरे, छगन केंदळे, देविदास केंदळे, रंगनाथ केंदळे, दशरथ गायकवाड, मारुती गायकवाड, सत्यशील मोरे, आजिनाथ आखाडे, भागवत आखाडे, अशोक आखाडे, तुकाराम उबाळे, भाऊसाहेब काकाळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला शाळेत जायचे आहे, पण रस्ता नसल्यामुळे आम्ही शाळा बुडवतोय. आम्हालाही तहसीलदार व्हायचे आहे. मात्र शाळा बुडाली तर अधिकारी कसे होणार? असे म्हणत आमचा रस्ता तात्काळ खुला करून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्याचवेळी महिलांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत, जर लवकरात लवकर रस्ता खुला केला नाही, तर आम्ही तहसील कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बदलीसाठी बोगस ‘आंधळे, पांगळे’ होणार्‍यांवर आता फौजदारी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातंर्गत बदली प्रक्रियेतून सुटका व्हावी अथवा सोय व्हावी, यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र, घटस्फोट, परितक्त्या असण्याची बोगस कागदपत्रे रंगवणार्‍या प्राथमिक शिक्षकांविरोधात आता...