Saturday, July 27, 2024
Homeनगरकुकडी आवर्तनासाठी आ. पवारांचे मंत्री पाटील यांना साकडे

कुकडी आवर्तनासाठी आ. पवारांचे मंत्री पाटील यांना साकडे

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणार्‍या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या 5 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे तसेच घोड डाव्या आणि उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू करावे, अशी विनंती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन केली आहे.

- Advertisement -

पुणे येथे 2 सप्टेंबरला कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. परंतु एवढा उशिर न करता त्याआधीच बैठक घेऊन त्यामध्ये मंत्री महोदयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशीही विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

कर्जतमधील एकूण 54 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी कूकडी डाव्या कालव्यावर अवलंबून आहेत. मागील हंगामातील आवर्तन मे 2023 मध्ये संपून दोन महीने झाले आहेत. आणि पावसाळा सुरू होऊन देखील म्हणावा तसा चांगला पाऊस दोन्ही तालुक्यात झालेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई आहे. आमदार रोहित पवार यांनी शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकरी व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक घेतली होती.

ज्यामध्ये 30 तारखेऐवजी 5 सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी विनंती केली आ.पवार यांनी याच विषयी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून याबाबत शेतकर्‍यांची बाजू मांडली. यासोबतच घोड कालव्यावरती कर्जत जामखेड मधील एकूण 14 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. मागील हंगामातील आवर्तन संपून जवळ जवळ दोन ते तीन महीने झाले आहेत. आणि यंदा पाऊसही कमी पडला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी आणि ओलीताखालील येणार्‍या पीक क्षेत्रासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर घोड कालव्याचे आवर्तन सुरू करावे, अशीही विनंती त्यांनी मंत्री पाटील यांना केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या