Monday, January 12, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : लाडक्या बहिणींना महापालिका निवडणुकीआधी ३००० मिळणार की नाही? देवेंद्र...

Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना महापालिका निवडणुकीआधी ३००० मिळणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून एकत्रित ३,००० रुपये मिळणार असल्याची चर्चा असतानाच, काँग्रेसने या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून या योजनेचा हप्ता तूर्तास रोखण्याची मागणी केली आहे. “आमचा योजनेला विरोध नाही, मात्र महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे वितरित करण्यात यावे,” अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. या पत्रामुळे १४ जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

YouTube video player

काँग्रेसने आपल्या पत्रात खळबळजनक आरोप केला आहे. मतदानाच्या अवघ्या काही दिवस आधी १ कोटीहून अधिक महिला मतदारांच्या खात्यात प्रत्येकी ३,००० रुपये जमा करणे, हा मतदारांना प्रभावित करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. याला काँग्रेसने ‘सामूहिक सरकारी लाच’ असे संबोधले असून, हे आदर्श आचारसंहितेचे थेट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही रक्कम रोखून धरण्याचे निर्देश शासनाला द्यावेत, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काँग्रेसच्या या पवित्र्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेस आणि विरोधक सुरुवातीपासूनच लाडक्या बहिणींच्या विरोधात आहेत. याआधी त्यांनी योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आता ते पैसे रोखण्यासाठी पत्र लिहीत आहेत,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण ही एक आधीपासून सुरू असलेली निरंतर योजना आहे. निवडणूक आचारसंहितेच्या नियमांनुसार, जी योजना आधीपासून कार्यान्वित आहे, ती थांबवता येत नाही. त्यामुळे कोणी कितीही पत्रे लिहिली किंवा विरोध केला तरी ही योजना थांबणार नाही. महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळतीलच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आता हे स्पष्ट झाले आहे की, सरकार कोणत्याही परिस्थितीत मकरसंक्रांतीपूर्वी किंवा महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधी महिलांच्या खात्यात ३,००० रुपये जमा करण्याच्या तयारीत आहे. प्रशासकीय पातळीवर या निधी वितरणाची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. आता या वादावर राज्य निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

राज

K Annamalai: मला धमकी देणारे आदित्य, राज ठाकरे कोण?; राज ठाकरेंच्या...

0
मुंबई | Mumbaiमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. एकीकडे मुंबई मराठी...