अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
न्यायालयात सुरू असलेल्या जागेच्या वादातून पती- पत्नीला मारहाण करत दोन दिवसांत घर खाली केले नाही तर जिवंत मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना राधाकृष्णनगर, तपोवन रस्ता येथे शुक्रवारी (07 मार्च) दुपारी 4:30 वाजता घडली. याप्रकरणी आशा रवींद्र बारस्कर (वय 32 रा. राधाकृष्णनगर, तपोवन रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम फिर्यादीच्या घरी आले व जागा खाली करण्याची धमकी दिली. त्या इसमांनी सांगितले की, ही जागा मोहनलाल रामआवतार मानधन आणि पराग मोहनलाल मानधन यांनी विकत घेतली असून, तुम्ही दोन दिवसांत घर खाली करा, अन्यथा तुम्हाला जिवंत मारून टाकू. तसेच, तुमचा नवरा बाहेर कुठेही दिसला तर त्याला कोणत्याही गाडीखाली उडवून टाकू, असेही त्यांनी धमकावले. त्यातील एका इसमाने माझ्याकडे बंदूक आहे, आत्ताच गोळ्या घालून ठार मारीन असेही म्हणत धमकी दिली.
या दरम्यान, फिर्यादीच्या पतीला एका इसमाने जोरदार बुक्का मारला. त्यांना वाचवण्यासाठी फिर्यादी पुढे गेल्या असता दुसर्या इसमाने लोखंडी पाईपने त्यांच्या दोन्ही पायांवर मारहाण केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्हाला मोहनलाल मानधन आणि पराग मानधन यांनी येथे पाठवले आहे, अशी कबुलीही त्या दोन इसमांनी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गांगर्डे करत आहेत.