लासलगाव |वार्ताहर| Lasalgav
बांगलादेश सरकारने गेल्या आठवड्यात गुरुवारी कांद्यावरील आयात बंदी काही प्रमाणात खुली केल्यानंतर आज सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात किमान तीनशे रुपयांपर्यंत वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असताना मात्र कांद्याच्या कमाल भावात १७५ तर सरासरी दरात ७५ रुपयांची अल्पशी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कभी गम असे नाराजीचे वातावरण दिसून आले.
बांगलादेशातील स्थानिक कांदा निकास होईपर्यंत भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार बांगलादेशने तब्बल पाच महिन्यापासून भारतीय कांद्याची आयात थांबविली आणि १० टक्के आयात शुल्क लावले होते. बांगलादेशीय खरेदीदारांना जास्तीत जास्त कांदा आयात करण्यासाठी परवाने न दिल्यामुळे भारतातून कांदा नाममात्र प्रमाणात निर्यात होत असल्यामुळे बाजार भाव कमी झाले होते.
बांगलादेश सरकारने कांदा आयतीसाठी पहिल्या टप्प्यात काही निवडक निर्यातदारांना परवाने दिल्याने कांद्याची निर्यात सुरु झाली मात्र ती अत्यल्प प्रमाणात आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारी ११२६ वाहनातून १६ हजार ५९२ क्विंटल कांद्याची आवक झाली.
कांद्याला जास्तीतजास्त १९०० रुपये, किमान ६०० तर सरासरी १६५० रुपये प्रतीक्विंट बाजार भाव मिळाला. गेल्या आठवड्यात शनिवारी ५८२ वाहनातून ८ हजार ६२४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. जास्तीतजास्त १७२५ रुपये, किमान तर सरासरी १५७५ रुपये क्विंटला भाव मिळाला होता.
आशिया खंडात कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अल्पशी वाढ झाली. मात्र ही वाढ किती दिवस टिकते याबाबत साशकता आहे.
– प्रवीण कदम, कांदा निर्यातदार
बांगलादेशने आयात बंदी जरी हटवली तरी आज लासलगाव बाजार समिती कांद्याच्या बाजारभावात किमान दोन तीनशे रुपयांनी वाढ होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या आठवड्यात विक्री केलेल्या कांद्याला चौदाशे रुपये इतका बाजार भाव मिळाला त्याच कांद्याला आज १३५० रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. मग कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली की घट झाली.
– संजय मोरे, शेतकरी कोटमगाव
आमचे सामायिक कुटुंब बारा एकर शेतीत उन्हाळ कांद्याचे पीक घेतले येवला तालुका दुष्काळग्रस्त असल्याने शेवटच्या टप्प्यात टँकरद्वारे पाणी दिले उत्पादन खर्च १७०० ते १८०० रुपये प्रतिक्विंट आला एप्रिल महिन्यात कांदा काढला. मात्र त्यावेळी बाजार भाव नसल्याने चाळीमध्ये साठवला त्यातील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने २२०० ते २५०० रुपये क्विंटल पर्यंत उत्पादन खर्च आला आज मिळणाऱ्या बाजारभावातून तोट्यात कांदा विक्री करावा लागत असल्याने विक्री झालेल्या कांद्याला व विक्री होणाऱ्या कांद्याला एक हजार रुपयांचे अनुदान प्रतिक्विंटल द्यावे अशी आमची मागणी आहे.
– नवनाथ शेळके, शेतकरी सातारे (येवला)
२० आणि २२ ऑगस्ट लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव राहणार बंद
जैन समाजाचे पर्युषण पर्व प्रारंभ २० तर२२ ऑगस्ट रोजी बैलपोळा सणमुळे लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद राहणार आहे. तसेच २१ ते २८ ऑगस्ट पर्यंत पोळ्याची सुट्टी वगळता दररोज कांदा लिलावाचे कामकाज सकाळी १० वाजेच्या दरम्यान सुरू होणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले.




