Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी घेतला पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा; विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवावा

मुख्यमंत्र्यांनी घेतला पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा; विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवावा

मुंबई:

राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

- Advertisement -

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं मात्र कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात देखील समृद्धी आली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रेडीरेकनेर दरात वाढघरे-मालमत्ता महागली

0
मुंबई | Mumbai आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95%...