अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बिबट्याच्या मानवी वस्तीमध्ये वाढलेल्या हल्ल्यामुळे आधीच वन विभाग बेजार झालेला आहे. जिल्ह्यातील 927 गावांमध्ये बिबट्याचे अस्तित्व जाणवले असून वन विभागाने या पार्श्वभूमीवर लावलेल्या पिंजर्यांमध्ये 40 बिबटे अडकले आहेत. जुन्नर (जि. पुणे) येथील बिबट्या बचाव केंद्र (रेस्क्यू सेंटर) मध्ये क्षमतेपेक्षा जास्त बिबटे असल्याने जिल्ह्यात पकडलेल्या बिबट्यांना घेतले जात नाही. यामुळे वन विभागाच्या विविध रोपवाटिकांमध्ये 40 बिबटे सध्या सरकारी पाहुणचार घेत आहेत. यामुळे आधी या बिबट्याचे हल्ला आणि आता पाहुणचार यामुळे वन विभागाचा भार वाढला आहे.
जिल्ह्यात डिसेंबर महिनाभरात 18 पेक्षा अधिक बिबटे जेरबंद झाले आहेत. सद्यःस्थितीत जखमी आणि इतर असे 40 बिबटे जिल्ह्यातील वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये पाहुणचार घेत आहेत. हे बिबटे पिंजर्यातच असल्याने नवीन मोहिमांसाठी पिंजरेही अपुरे पडत आहेत. या बिबट्यांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि त्यांना ठेवण्यासाठी हक्काची जागा नसल्याने त्यांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप परवानगी मिळालेली नाही. अकोले, राहुरी, संगमनेर यासह विविध क्षेत्रीय स्तरांवरील रोपवाटिकांमध्ये पिंजर्यात बंद आहेत. या बिबट्यांना पुन्हा निसर्गात न सोडता थेट इतर बचाव केंद्रांमध्ये पाठवण्याची परवानगी मागितली आहे.
दीड महिना उलटूनही अद्याप ही परवानगी मिळालेली नाही. खाद्याचा वाढता खर्च आणि सुरक्षेचा प्रश्न वन विभागासमोर उभा आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून दर दोन दिवसाला एक ते दोन बिबटे जेरबंद होत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही. त्यामुळे पकडलेले बिबटे पिंजर्यातच ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. विभागात 600 पिंजरे उपलब्ध असले तरी 970 गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे. रेस्क्यू सेंटर नसल्याने बिबट्यांना पिंजर्यातच ठेवले जात आहे. वन विभागाने पकडलेल्या बिबट्यांबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास पाठविलेली आहे. या बिबट्यांच्या स्थलांतराबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून निर्णय घेतला जाईल. त्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले.




