नाशिक | Nashik
मागील काही महिन्यात बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) बिबट्याचे दर्शन, जीवितहानीच्या अनेक घटना सातत्याने नाशिक (Nashik) आणि आसपासच्या परिसरात घडत आहेत. मागच्या महिन्याभरात चिमुकल्यांना बिबट्याच्या हल्ल्यांत जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. मानवी जिवासोबतच बिबट्याच्या देखील जीविताला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर आता याप्रकरणांची गंभीर दखल नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी घेतली आहे.
बिबट्याच्या प्रश्नाचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने खासदार राजाभाऊ वाजे यांनी उपवनसंरक्षक सिद्देश सावर्डेकर यांच्यासोबत सोमवार (दि. १५ सप्टेंबर) बैठक घेत प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय उपाययोजना करणे शक्य आहे याबाबत या बैठकीत (Meting) चर्चा झाली.तसेच सोबत मिळून या समस्येवर तोडगा काढण्याबाबत दोघांत एकमत झाले. नाशिक तालुक्यात वडनेर पाठोपाठ सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे दहा वर्षीय बालकाचा व खंडांगळी याठिकाणी देखील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू (Death) झाला झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मागील आठवड्याभरात ४ ते ५ ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या तर असंख्य ठिकाणी दर्शन दिल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षात बिबट्याचा वाढलेला अधिवास आणि मानवी वस्तीमधील संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही समस्या अत्यंत गंभीर होत चालली असून, यामधून मानवी आणि बिबट्याच्या देखील जिविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड आणि काही प्रमाणात दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव तालुक्यातील असंख्य गावात अक्षरशः दहशतीचे वातावरण आहे. अंधार पडल्यानंतर बंदिस्त करून घ्यायची वेळ नागरिकांवर येत आहेत. त्यातच लोडशेडिंगमुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
दरम्यान, याआधी रात्रीच्यावेळी बिबट्या हल्ला करत होता. मात्र,मागील काही घटनांमधून दिवसादेखील बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात लहान चिमुकले (Little Babies) बिबट्यासाठी सोपे शिकार ठरत आहेत. यामुळे दहशत सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
बिबट्या ही समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर ठोस उपाययोजना करावी लागणार आहे. गावागावात दहशतीचे वातावरण आहे. या भीतीचे रूपांतर उद्रेकात व्हायला वेळ लागणार नाही. बिबट्याचा वाढलेला अधिवास आणि मानवी वस्तीमधील मोकळा संचार यामुळे मानवी आणि बिबट्याच्या देखील जीविताला धोका निर्माण झाला आहे. यामुळे यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पाऊले टाकली जाणार आहेत. याबाबत दिल्लीपर्यंत लढाई करावी लागणार आहे, त्यादृष्टीने पाऊल टाकायला आम्ही सुरुवात केली आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक लोकसभा





