अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून 8 कोटी 13 लाख 44 हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे. बिबट्यांच्या वाढत्या हालचालींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने वन विभागाशी संपर्क ठेवत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यास आवश्यक अतिरिक्त यंत्रसामग्री उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
यानूसार जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध होणार्या निधीतून 300 पिंजरे, 300 ट्रॅप कॅमेरे, तसेच जॅकेट, शूज, टॉर्च गन्स आणि संरक्षणात्मक किट यांसारखी रेस्क्यू उपकरणे खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय 22 रेस्क्यू वाहने तातडीने खरेदी करण्यासही प्रशासनास सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात 1 हजार 150 बिबटे असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम येणार आहे. पकडलेले बिबटे वनतारा येथे स्थलांतरित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यवाहीची अंमलबजावणी त्वरित करण्याचे निर्देशही देण्यात आले. तालुकानिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.




