मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमधील ९७९ औषधांचे नमुने तपासले असता त्यापैकी ११ औषधांमध्ये मूळ घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ११ वितरक कंपन्यांचा बनावट औषध वितरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाह यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
राज्यातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच खासगी रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांना काही औषध उत्पादक कंपन्यांमार्फत औषधांच्या पॅकिंगवर दर्शविण्यात आलेल्या घटकांच्या तुलनेत प्रत्यक्षात कमी घटक असलेली औषधे पुरविली जात असल्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती.
या लक्षवेधीच्या चर्चेत अरूण लाड, सदाशिव खोत यांनीही सहभाग घेतला. त्यावर उत्तर देताना झिरवाळ म्हणाले, औषध विक्रेते आणि औषध विक्रेते कंपन्यामार्फत पॅकिंगवर दर्शविण्यात आलेल्या घटकांची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती औषधांतील घटकांची तपासणी करेल. अन्न आणि औषध प्रशासन सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमल्या जाणाऱ्या या समितीच्या अहवालानंतर दोषी आढळलेल्या संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




