अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, असे संकेत राज्य निवडणूक आयोगाच्या सुत्रांच्यावतीने देण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगर पालिका, नगर परिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीच्यादृष्टीने मजलदरमजल निवडणूक तयारी पूर्ण करण्यात येत आहे. नगरसह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यावर वेगवेगळ्या न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी होवून त्या फेटाळण्यात आल्याने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जानेवारी 2026 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर निवडणुकीच्या तयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी महसूल विभागनिहाय ऑनलाईन बैठका घेतलेल्या आहेत. यात जिल्हानिहाय मतदान यंत्रे (ईव्हीएम) किती आहेत, त्यापैकी नादुरुस्त किती आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर पंचायत आणि महापालिकेसाठी मतदान केंद्रे किती होतील, त्यानुसार अतिरिक्त ईव्हीएम किती लागतील, याचा आढावा घेण्यात आला आहे.
तसेच ईव्हीएम ठेवण्यासाठी सुरक्षित गोदाम आहेत की नाहीत, याचीही माहिती घेण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी किती निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी लागणार, नगरपालिका, नगर पंचायत आणि महापालिकांसाठी किती अधिकार्यांची आवश्यकता आहे. त्यानुसार आवश्यक अधिकारी आहेत की नाहीत, किती ठिकाणी अधिकारी कमी आहेत, त्यानुसार संबंधित अधिकार्यांची कोणती पदे रिक्त आहेत, या तपाशील निवडणूक आयोगाने घेतलेला असून रिक्त पदे भरण्यासोबत निवडणुकीच्या तयारीचे कामाने वेग घेतला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणासाठी लवकरच आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यानंतर दिवाळीच्या आतबाहेर निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





